मुंबई : प्रतिनिधी – पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात तिघांची जमावाकडून हत्या करण्यात आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत 5 प्रमुख हल्लेखोरांसह एकूण 105 जणांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी सीआयडी चौकशी सुरू करण्यात आली असताना भाजपने ही चौकशी अमान्य करत याप्रकरणी सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
’पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या गडचिंचले गावात दोन साधू व त्यांचा एक वाहन चालक अशा तिघांची पोलिसांसमक्ष जमावाने निर्घुण हत्या केली आहे, ही बाब खूप धक्कादायक व चिंतेची आहे. विशेषत: पोलिसांसमोर घडलेली ही निर्घुण हत्या बर्याच शंका उपस्थित करतात. त्यामुळे या गंभीर घटनेचा तपास निपक्षपातीपणे होण्याच्या दृष्टीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा व दोषींविरुद्ध कठोर कारवाई करावी’, अशी मागणी विधानपरिषदेचे
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी सोमवारी यांसंदर्भात पालघरचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठविले आहे. या पत्रानुसार या गंभीर घटनेच्या वेळी पोलिसांनी नागरिकांना आवाहन करून शांतता राखण्याचे काम करायला हवे होते, तथापि याबाबत पोलिसांनी हेतुपूर्वक केलेली निष्क्रियता दिसून येते. साधूंची हत्या होत असताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेणे याचा अर्थ पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली काम करत असण्याची शक्यता आहे, असेही या पत्रात नमूद केले आहे.