ग्रामस्थांची दुरुस्तीची मागणी

खोपोली ः प्रतिनिधी
खोपोली नगरपालिका हद्दीतील शेडवली गावासाठी असलेल्या स्मशानभूमीवरील पत्रे तुटल्याने ही स्मशानभूमी शेवटची घटका मोजत असल्याने येथील ग्रामस्थ तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. लवकरात लवकर या स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. या स्मशानभूमीची दुरुस्ती कधी होणार याकडे शेडवलीकरांचे लक्ष लागले आहे.
शेडवली गाव परिसरात एखादी दुःखद घटना घडल्यास अंत्यविधीदरम्यान स्मशानभूमीवरील पत्रे तुटल्याने पावसाळ्यात पावसापासून बचाव, तर उन्हाळ्यात भर उन्हात थांबून नागरिकांना अंत्यविधी करावा लागत आहे. येथील ग्रामस्थांनी आपली व्यथा संबंधित प्रशासनाकडे मांडूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रशासनाविरोधात येथे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे नगरपालिकेने स्मशानभूमीवरील पत्रे बसवून स्मशानभूमीची दुरुस्ती करावी, जेणेकरून निदान अंत्यविधीदरम्यान तरी यातना सहन कराव्या लागणार नाहीत, अशी मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper