मुंबई : प्रतिनिधी
कोरोना संकटात देवेंद्र फडणवीसांकडे फक्त दोन तास मागितले असते तर त्यांनी दोन तासांमध्ये कितीतरी प्रश्न सोडवले असते. पण ही मदत घ्यायला यांचा इगो आडवा येतो आहे. असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा या शब्दांमध्ये टीकास्त्र सोडले आहे.
लॉकडाऊन की अनलॉक अजून कळत नाही. मतभेद आणि गोंधळ संपत नाहीत. लॉकडाऊनमध्ये जेवढे कडक निर्बंध नव्हते तेवढे अनलॉकमध्ये घालून ठेवले आहेत लोकांनी नेमके काय करायचे? असाही प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील यांनी ही टीका केली आहे.मुंबईत एवढे मूर्खपणाचे निर्णय घेतले जात आहेत की त्यावर काही बोलायलाच नको. आजार राहिला बाजूला पण सामान्य माणूस वैतागला आहे. आम्ही काही बोललो की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील लगेच बोलतात सत्तेची हाव लागली आहे. तुमच्यात मतभेद आहेत तर आम्ही बोलायचे नाही का? चौथीची मुलगीही सांगेल यांचे काही खरे नाही असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper