Breaking News

भाज्यांचा जाणवतोय तुटवडा

पनवेल : बातमीदार

पावसाळा सुरू झाला आहे आणि मंगळवारपासून श्रावण महिनाही सुरू होत आहे. अनेकांचा शाकाहार सुरू होऊन भाजीपाल्याच्या मागणीत वाढ होणार आहे. मात्र अनेक ठिकाणी असलेल्या लॉकडाऊनमुळे बाजारात भाज्यांची आवक कमीच आहे. त्यामुळे भाज्यांचा तुटवडा निर्माण झाला असून दरही वाढलेले आहेत. या आठवड्यापासून तर घाऊक बाजारात अनेक भाज्यांचे दर किलोमागे 50 ते 65 रुपये झाले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आपला खिसा रिकामा करावा लागत आहे. श्रावण महिन्यात भाज्यांची आवक वाढली नाही तर टंचाई अधिक जाणवण्याची शक्यता आहे.

घाऊक बाजारात अजूनही 250 ते 270 गाड्या भाजीपाला येत आहे. तोही किरकोळ बाजारात व्यवस्थितपणे पोहचत नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला खरेदी करण्यासाठी अडचण येत आहे. सध्या घाऊक बाजारात अनेक पसंतीच्या भाज्यांचे दर मागच्या महिन्यापेक्षाही अधिक वाढले आहेत. मागच्या महिन्यात अनेक भाज्या घाऊक बाजारातच 40 ते 50 रुपये किलो झाल्या होत्या. तर आता हे दर 65 रुपये किलोच्या घरात गेले आहेत. हे दर असेच वाढतच राहिल्यास श्रावणात ग्राहकांना महागड्या भाज्या खरेदी कराव्या लागण्याची शक्यता आहे.

सध्या घाऊक बाजारात फरसबी 40 रुपये किलो, घेवडा 30 ते 35 रुपये किलो, सिमला मिरची 40 ते 45 रुपये किलो, शेवगा शेंग 45 ते 50 रुपये किलो, टोमॅटो 35 ते 40 रुपये किलो, हिरवा वाटाणा 55 ते 65 रुपये किलो, हिरवी मिरची 40 ते 45 रुपये किलो आहे, अशी माहिती बाजार समितीकडून देण्यात आली आहे. तर इतर भाज्या म्हणजे भेंडी 25 ते 30 रुपये किलो, कारली 28 ते 30 रुपये किलो, परवल 26 ते 30 रुपये किलो, भोपळा 16 ते 20 रुपये किलो, वालवड 36 ते 40 रुपये किलो आहे. प्रत्येक भाजीत किलोमागे 10 ते 20 रुपयांची वाढ आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचे दर 80 ते 100 रुपये किलोच्या घरात गेले आहेत. भाज्या घेण्यासाठी सर्वसामान्यांना आपले पाकीट रिकामी करावे लागत आहे.

आवक वाढणे गरजेचे

उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असून या काळात तर भाजीपाल्याची मागणी नेहमीपेक्षा 40 ते 50 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक वाढण्याची गरज आहे. भाजीपाल्याची आवक वाढली तरच त्याचे दर नियंत्रणात येतील, असे मत अनेक व्यापारी व्यक्त करत आहेत. सध्या आवक कमी असल्याने दर वाढले असल्याचे व्यापारी सांगत आहेत.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply