कळंबोली : प्रतिनिधी
कळंबोली शहरात सध्या उद्यानात काही वाहनचालकांनी आपली वाहने पार्क केली आहेत. त्यामुळे नागरिकांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. विरंगुळा म्हणून उद्यानांमध्ये ते जात आहेत. असे असताना कळंबोलीतील नागरिकांना उद्यानांमध्ये होत असलेल्या वाहनांच्या पार्किंगमुळे मोठ्या समस्येचा सामना करावा लागत आहे.
कळंबोली सेक्टर 4 या परिसरात असलेल्या एमजीएम हॉस्पिटलशेजारील उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात काही खाजगी चारचाकी वाहनांची पार्किंग केली जाते. प्रशासन वेळोवेळी नागरिकांसाठी सुविधा देण्याचा प्रयत्न करीत असते, परंतु अशा काही बेशिस्त वाहनचालकांमुळे नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागते तसेच येथील उद्यानांमध्ये सायंकाळच्या वेळेस कट्ट्यांवर काही टवाळखोर टिंगलटवाळी करताना दिसत असतात. त्यातच एका कोपर्यात मद्यपींचा अड्डा यामुळेही नागरिकांना त्रास होत आहे.
कळंबोली शहरामध्ये असलेल्या उद्यानांपैकी प्रत्येक उद्यानामध्ये सिडकोच्या दुर्लक्षामुळे लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्यांची नासधूस झाली आहे, तर काही ठिकाणी खेळण्याचे साहित्यच गायब झाली आहेत. आता या उद्यानांचा काही बेशिस्त वाहनचालक वाहने पार्किंग जागेसाठी वापर केला जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
यंत्रणा आपल्या पद्धतीने सोयीसुविधा देत असते, परंतु काही बेशिस्त नागरिक सोयीसुविधांचा वापर योग्यरित्या करीत नसल्याने याचा त्रास अन्य नागरिकांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
कळंबोलीतील उद्यानांमध्ये काही बेशिस्त वाहनचालक आपल्या गाड्या येथे पार्क करीत असतात. त्यामुळे येथे येणार्या लहान मुलांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो. काही वेळेस येथे सायंकाळी मद्यपीही बसलेले दिसतात.
-प्रभाकर कांबळे, जेष्ठ नागरिक
RamPrahar – The Panvel Daily Paper