अहमदाबाद : वृत्तसंस्था
तिसर्या कसोटी सामन्यातील निराशाजनक कामगिरीनंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंनी चौथ्या सामन्यातही सपशेप लोटांगण घेतले. अक्षर पटेल, मोहम्मद सिराज आणि आर. आश्विन यांच्या भेदक मार्यासमोर इंग्लंडचा संघ टिकाव धरू शकला नाही. इंग्लंडचा संपूर्ण संघ 205 धावांवरच गारद झाला. बेन स्टोक्स वगळता एकाही खेळाडूनला जम बसवता आला नाही. भारताकडून अक्षरने सर्वाधिक चार गडी बाद केले. दरम्यान, भारताचीही सुरुवात निराशाजनक झाली. शून्य धावसंख्या असतानाच शुभमन गिल बाद झाला. त्यानंतर चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्माने सावध पवित्रा घेतला. पहिल्या दिवसाखेर भारताने 1 बाद 24
धावा केल्या आहेत.
झटपट संपलेल्या तिसर्या कसोटी सामन्यामुळे चर्चेत असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडकडून झॅक क्रॉली आणि डॉमिनिक सिब्ले मैदानात आले, मात्र सलामीची जोडी फार काळ मैदानात तग धरू शकली नाही. अक्षर पटेलने आपल्या पहिल्याच षटकात सिब्लेला त्रिफळाचित केले. सिबलेलापाठोपाठ अक्षरने दुसरा सलामीवीर झॅक क्रॉलीलाही टिपले.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटही लवकरच माघारी परतला. मोहम्मद सिराजने रूटचा अडथळा दूर केला. बेन स्टोक्सने सर्वाधिक 55 धावा करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला, तर डॅनियल लॉरेन्सने 46 धावांची खेळी केली. अखेर इंग्लंडचा पहिला डाव 205 धावांवर आटोपला. भारताकडून अक्षरने सर्वाधिक चार, आर. अश्विनने तीन मोहम्मद सिराजने आणि वॉशिंग्टन सुंदरने एक गडी बाद केला.
इंग्लंडचा डाव संपल्यावर भारताकडून सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरूवात केली, मात्र डाव्याच्या पहिल्याच षटकात जेम्स अंडरसनने गिलला बाद केले. भारताची धावसंख्या शून्य असतानाच गिल तंबूत परतला. पहिल्या दिवसाखेर चेतेश्वर पुजारा (15) आणि रोहित शर्मा (8) खेळपट्टीवर आहेत.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper