नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामान्यांच्या मालिकेत भारताने अंतिम सामन्यात विजय मिळवत मालिका जिंकली. त्यानंतर टीम इंडियाचे सर्वत्र कौतुक होत असून इंग्लडच्या सॅम करणच्या खेळीचीही अनेकांनी प्रशंसा केली. भारताचा माजी तडाखेबंद सलामीवीर वीरेंद्र सेहवागनेही सॅमचे कौतुक करून इंग्लंड संघाला टोला लगावला.
इंग्लंडविरुद्ध अत्यंत चुरशीच्या झालेल्या तिसर्या एकदिवसीय सामन्यात भारताने सात धावांनी विजय मिळवत तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. तिसर्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या संघाने झुंजार खेळ केला, मात्र अखेरच्या क्षणी त्यांना पराभूत व्हावे लागले होते. दरम्यान, या सामन्यात नाबाद 95 धावांची खेळी करणार्या इंग्लंडच्या सॅम करणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
सॅम करणच्या खेळीचे नेटीझन्सनेही कौतुक केले आहे. भारताचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवागनेही सॅमच्या फलंदाजीचे कौतुक केले. सॅमने मजबूत खेळ करत इंग्लंडला शेवटपर्यंत सामन्यात जिवंत ठेवले, असे सेहवागने म्हटले.
सेहवागने सॅमचे कौतुक करतानाच इंग्लंडला टोला लगावला. ‘खाली हात आये थे, खाली हात जायेंगे इंग्लंडवाले,’ असा ट्विट सेहवागने इंग्लंडच्या टीमला उद्देशून केले, तसेच टीम इंडियाचे अभिनंदन केले. ही मालिका सगळ्याच फॉरमटमध्ये अतिशय चुरशीची झाल्याचेही सेहवागने म्हटले आहे.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper