Breaking News

पाणी शिरून नुकसान झाल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक

आंदोलन करण्याचा इशारा

पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुसळधार पावसामुळे पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी शिरून ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्येला सिडको प्रशासन जबाबदार असल्याने डुंगी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार, सिडको आणि पोलीस अधिकारी यांच्यासोबत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच इतर मान्यवरांची मंगळवारी (दि. 20) प्रांत कार्यालयात बैठक झाली.
पनवेल तालुक्यातील डुंगी गावामध्ये दरवर्षी पावसाळ्यामध्ये पाणी शिरते. यंदाही गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे डुंगी गावात पाणी शिरले. डुंगी ग्रामस्थांवर ओढावलेल्या या संकटाला सिडको प्रशासन जबाबदार असून या परिस्थितीतही सिडको प्रशासनाच्या वतीने कोणतीही मदत करण्यात आली नाही. त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले.
याची दखल घेत मंगळवारी जिल्हाधिकारी निधी चौधरी, तहसीलदार विजय तळेकर, सिडकोचे भूमी व भूमापन अधिकारी माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लांडगे यांच्यासोबत ग्रामस्थांच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर, उपमहापौर जगदिश गायकवाड, 27 गाव कृती समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी यांची पदाधिकार्‍यांसह बैठक झाली.
या वेळी ग्रामस्थांच्या मागण्या जोरकसपणे मांडण्यात आल्या. या संदर्भात 23 जुलै रोजी पुन्हा बैठक होणार आहे. त्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे. या वेळी 27 गाव कृती समिती प्रेम पाटील, कायदेशीर सल्लागार राहुल मोकल, रुपेश धुमाळ, किरण पवार, कांचन घरत, सल्लागार प्रमुख महेंद्र पाटील, सरपंच बाळाराम नाईक, कार्याध्यक्ष सुनील म्हात्रे यांच्यासह डुंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्रातूनही ५० लाख घुसखोर बांगलादेशी बाद होणार -किरीट सोमय्या

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयगाच्या वतीने विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियान राबविण्यात येत आहे. …

Leave a Reply