महाड ः प्रतिनिधी
पुराचे पाणी शिरून महाडमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर धावले असून, त्यांनी पूरग्रस्तांसाठी शनिवारी (दि. 24) अन्न-पाण्याचे वाटप सुरू केले. महाड शहर परिसरासह तालुक्यात अतिवृष्टी होऊन सावित्री, काळ आणि गांधारी या नद्यांचे पाणी घरे आणि दुकानांमध्ये शिरले होते. यामध्ये महाडकरांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व काही भिजून, वाहून गेले असल्याने दोन वेळची भूक कशी भागवावी याही विवंचनेत ते आहेत. हे ओळखून आमदार प्रशांत ठाकूर यांनी सलग दुसर्या दिवशी महाडचा दौरा केला आणि तेथील नागरिकांना तयार अन्नाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या दिल्या. गुरुकुल शाळेत हा मदतीचा कॅम्प लावण्यात आला आहे, तसेच नागरिकांच्या घरातील आणि व्यापार्यांच्या दुकानातील चिखल काढण्यासाठी दोन टँकर अहोरात्र फिरत आहेत. या वेळी माजी मंत्री गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश मोहिते, सरचिटणीस बिपीन महामुणकर, राजेश मापारा, वैकुंठ पाटील, अक्षय ताडफळे, पनवेल महापालिकेचे स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, हॅप्पी सिंग आदी उपस्थित होते.
तळीये दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा 49वर
अतिवृष्टीमुळे दरड कोसळण्याची दुर्घटना घडलेल्या तळीये गावातील मृतांचा आकडा 49वर जाऊन पोहचला आहे. तब्बल 50पेक्षा अधिक माणसे अजूनही ढिगार्याखालीच असल्याची भीती व्यक्त होत आहे. तळीये गावात गुरुवारी दरड कोसळल्याने काही क्षणांमध्ये होत्याचे नव्हते झाले. येथे शुक्रवारी 38 मृतदेह हाती लागले होते. त्यात शनिवारी वाढ होऊन मृतांचा आकडा 49वर गेला. अजूनही काही माणसे ढिगार्याखाली असल्याचे सांगण्यात येत असून एनडीआरएफच्या पथकाकडून बचावकार्य सुरूच आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी तळीये गावात येऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री आदिती तटकरे, मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार सुनील तटकरे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मिलिंद नार्वेकर, आमदार भरत गोगावले, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे आदी उपस्थित होते.