लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दावा
जेएनपीटी ः प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात, राज्यात विकासाची गंगा आणण्याचे काम केले.त्यामुळे होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत निश्चित भाजपा-शिवसेना युतीला बहुमत प्राप्त होणार असून, विरोधकांच्या वल्गना हवेत उडून मावळ लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा फडकणार, असा विश्वास लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची तारीख जवळ येऊ लागल्याने प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसंदर्भात लोकनेते रामशेठ ठाकूर यांना
विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ नुकतेच खारघर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांच्या या सभेला युतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच येथील रहिवाशांनीही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सभेतील ओसंडून वाहणार्या गर्दीचा धसका घेतलेल्या विरोधकांच्या पायाखालची वाळू आता सरकू लागली आहे. त्यामुळे विरोधक आज भाजप सरकारवर टीका टिप्पणी करीत आहेत याकडेही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी लक्ष वेधले.
अशा टीका टिप्पणी करणार्या विरोधकांना पनवेल, उरण, कर्जतची जनता या निवडणुकीच्या माध्यमातून निश्चित त्यांची जागा दाखविण्याचे काम करणार आहे, असा विश्वासही लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला.
RamPrahar – The Panvel Daily Paper