Breaking News

पनवेलमध्ये ओबीसी जागर

जनजागरण रथयात्रेस उत्तम प्रतिसाद

पनवेल ः रामप्रहर वृत्त
ओबीसी जागर अभियान अंतर्गत भाजप उत्तर रायगड व पनवेल शहर ओबीसी मोर्चातर्फे जनजागरण रथयात्रेचे आयोजन रविवारी (दि. 21) पनवेलमध्ये करण्यात आले होते. भाजप मध्यवर्ती कार्यालय येथे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्या हस्ते या रथयात्रेस शुभारंभ झाला.
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी ठाकरे सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत आहे. सरकारने केवळ तात्पुरता अध्यादेश काढून ओबीसी समाजाची दिशाभूल चालवली आहे. हे सरकार ओबीसी समाजाबाबत उदासीन आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे राज्य मागास आयोगाची या सरकारने केलेली दुर्दशा. ओबीसी समाजाला गृहित धरले जात आहे. या वेळी जर ओबीसी समाज एकत्र आला नाही, तर ओबीसींचे राजकीय अस्तित्व संपून जाईल आणि सामाजिक अस्तित्वदेखील धोक्यात
येईल. त्यामुळे ओबीसी समाजाने एकत्र यावे यासाठी हे अभियान राबवले जात आहे.
या वेळी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड. मनोज भुजबळ, उत्तर रायगड अध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हात्रे, जिल्हा महिला संयोजक सीता पाटील, पनवेल शहर अध्यक्ष रामनाथ पाटील, महिला संयोजक अ‍ॅड. वृषाली वाघमारे, महापालिका प्रभाग समिती अध्यक्ष सुशीला घरत, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका राजश्री वावेकर, सरचिटणीस अभिलाषा ठाकूर, हेमांगी वाघमारे, सदस्य भारती घरत, विभूती तांडेल, शैला आंबेकर, जरीना शेख, खैरे यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते व ओबीसी समाज बांधव-भगिनी उपस्थित होते. रथयात्रा पनवेल परिसरात फिरून ओबीसींच्या हक्काचे राजकीय आरक्षण त्यांना मिळालेच पाहिजे यासाठी जागर करण्यात आला.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे आज राजकीय आरक्षण गेले. उद्या शिक्षण आणि नोकरीचे आरक्षणही काढतील. या पार्श्वभूमीवर समाजात या संदर्भात जागर झाला पाहिजे आणि जोपर्यंत ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत होणार नाही तोपर्यंत ही लढाई सुरूच राहील, अशी भूमिका या जागर यात्रेची आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply