मुंबई : प्रतिनिधी
राज्यात नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल बुधवारी (दि. 19) जाहीर झाले. हाती आलेल्या कलानुसार सर्वाधिक जागा जिंकून भाजप क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजप हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 पालिकांमध्ये भाजपने सत्ता प्राप्त केली. सदस्यसंख्येतसुद्धा सर्वाधिक 415हून अधिक जागा जिंकत भाजप हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे.
जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो, असेही फडणवीस यांनी नमूद केले.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज 106 नगरपंचायतींसाठी झालेल्या निवडणुकांचे निकाल येत आहेत. यापैकी जवळपास 90 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत, तर सात जागांवरील निकाल उद्या लागणार आहेत. आतापर्यंत जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा एकदा हे सिद्ध झालेय की, भाजप महाराष्ट्रात नंबर वनचा पक्ष आहे. सदस्यसंख्येतही भाजप पहिल्या क्रमांकावर आहे. नगरपंचायती पूर्ण जिंकणे आणि भाजपच्या पाठिंब्याने जिंकणे यामध्येदेखील भाजप पहिल्या क्रमांकावर असल्याचे सिद्ध झाले आहे.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper