Breaking News

पावसानं केला खेळ

बेंगळुरू स्पर्धेबाहेर; राजस्थान जर-तरच्या फेर्‍यात

बेंगळुरू : वृत्तसंस्था

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यात पावसानं ‘खेळ’ केला. पावसानं पुन्हा हजेरी लावल्यानं पाच षटकांचा खेळवण्यात आलेला सामना अखेर अनिर्णित घोषित करण्यात आला. दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला. त्यामुळं बेंगळुरूचं स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आलं. तर राजस्थानची प्ले-ऑफ प्रवेशाची शक्यताही जवळ जवळ मावळली आहे.

राजस्थाननं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र पावसाच्या हजेरीमुळं सामना वेळेवर सुरू होऊ शकला नाही. काही तासांनी पाऊस थांबला आणि सामना सुरू झाला. हा सामना प्रत्येकी पाच षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं धावांचा पाऊस पडणार हे निश्चित झालं होतं. बेंगळुरूचे सलामीवीर विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सनं तशीच सुरुवात केली. विराटनं स्फोटक खेळी करताना पहिल्याच षटकात 23 धावा वसूल केल्या. विराटनं अवघ्या सात चेंडूंत 25 धावा ठोकल्या. त्यात तीन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. डिव्हिलियर्सनंही चार चेंडूंत 10 धावा केल्या. दोघे बाद झाल्यानंतर मात्र बेंगळुरू संघाची घसरगुंडी सुरू झाली. फलंदाज लागोपाठ बाद होत गेले. बेंगळुरूनं अखेर पाच षटकांत सात बाद 62 धावा केल्या.

63 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थान संघानंही आक्रमक खेळ केला. संजू सॅमसननं 13 चेंडूंत 28 धावा कुटल्या, तर लिविंगस्टननं सात चेंडूंत 11 धावा केल्या. संघाच्या 41 धावा असताना सॅमसन बाद झाला, मात्र त्यानंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली. त्यामुळं खेळ थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. हा सामना अनिर्णित राहिला. दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

बेंगळुरूचे 13 सामन्यांत 9 गुण आहेत, तर राजस्थानचे 11 गुण आहेत. बेंगळुरू संघ स्पर्धेबाहेर गेला आहे, तर राजस्थानच्या प्ले-ऑफ प्रवेशाची शक्यता जवळ जवळ मावळली आहे. त्यांचा प्ले-ऑफ प्रवेश आता ‘जर-तर’च्या गोष्टींवर अवलंबून आहे.

Check Also

कर्मवीर अण्णांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली

सातारा : रामप्रहर वृत्त आशिया खंडातील सर्वांत मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक …

Leave a Reply