अलिबाग : प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील 32 विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले. यातील 10 विद्यार्थी जिल्ह्यात सुखरूप परतले आहेत. त्यांनी रशिया विरुद्ध युक्रेन युद्धाचा थरारक अनुभव घेतला आहे. आणखी आठ विद्यार्थी रोमानियात, तर सात हंगेरीत दाखल झाले आहेत. हे विद्यार्थी शुक्रवारी (दि. 11) भारतात दाखल होण्याची शक्यता आहे.
आर्यन पाटील, अभिजीत थोरात, पूर्वा पाटील, यश काळबेरे, प्रेरणा दिघे, अद्वैत गाडे, सालवा सलीम महम्मद धनसे, प्रचिती पवार, मोहम्मद करीम शेख, अनुजा जायले हे 10 विद्यार्थी सुखरूप भारतात परतले आहेत. युद्ध परिस्थितीचा सामना करीत ते अखेर मायदेशी परतले. यासाठी त्यांना केंद्र सरकार आणि दुतावासाकडून मदत मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून उर्वरित 22 विद्यार्थ्यांपैकी आठ जण रोमानियात, तर सात जण हंगेरीतील बुडापेस्ट येथे पोहचले आहेत. दोन जण स्लोवाकीया, एक जण रशियन सीमेवर पोहचला आहे. हे सर्वजण येत्या दोन दिवसांत सुखरूप परतणे अपेक्षित आहे. युक्रेनमधून शेजारील देशांमध्ये नागरिकांना आणण्यात येत असून तेथून आपाल्या देशात विमानाद्वारे रवाना करण्यात येत आहे. याकरिता भारताने मिशन गंगा हाती घेतले असून यात वायुदलाची मदत घेतली जात आहे. मायदेशी परतलेल्यांचे अनुभव थक्क करणारे आहेत.
मदत कक्षातून संपर्क
युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अलिबाग येथे आपत्ती व्यवस्थापन कक्षात मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांशी दररोज संपर्क साधला जात आहे.
Check Also
पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …
RamPrahar – The Panvel Daily Paper