पंतप्रधान मोदींकडून भाजप स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आधी भारतात निराशा होती. आज देशातील प्रत्येक जण म्हणतोय की देश बदलतो आहे, गतीने प्रगती करतो आहे. कसल्याही भीतीविना आपल्या हितांसाठी लोक काम करीत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. 6) केले. ते भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
देशातील सर्वांत मोठा पक्ष असलेल्या भाजपचा 42वा स्थापना दिन सर्वत्र उत्साहात साजरा झाला. या दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा. अनेकांनी जनसंघापासून भाजपपर्यंत स्वत:ला वाहून घेतले त्या सर्वांना नमन करतो. हा स्थापना दिवस तीन कारणांनी महत्त्वाचा आहे. या वर्षी देशाची पंच्याहत्तरी साजरी करतो आहोत. दुसरे कारण आहे गतीने बदलत असलेल्या जागतिक परिस्थितीमध्ये भारतात सातत्याने नव्या शक्यता तयार होत आहेत. तिसरे म्हणजे चार राज्यांमध्ये भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर आले आहे. तीन दशकांनंतर राज्यसभेत एखाद्या पक्षाची संख्या 100च्या वर पोहचली आहे. भाजपचे काम सातत्याने वाढत आहे. हा अमृतकाळ भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी कर्तव्यकाळ आहे.
पंतप्रधान मोदींनी पुढे सांगितले की, भारत 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देत आहे. सबका साथ, सबका विकाससोबतच आम्ही सबका विश्वासही प्राप्त करीत आहोत. शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारी लाभ पोहचवला जावा हाच उद्देश आहे. जेव्हा हे घडते तेव्हा पक्षपात आणि भेदभाव टिकू शकत नाही. त्यामुळे आपले हे सेवाभाव अभियान सामाजिक न्यायाचे उदाहरण आहे. भाजपच्या कार्यकर्त्याला प्रत्येक घरात जाऊन आपला विचार न्यायचा आहे.