Breaking News

नवी मुंबईत 50 दिवसांत शून्य कोरोना मृत्यू

नवी मुंबई ः प्रतिनिधी

शहरात कोरोनाचे 2,049 मृत्यू झाले आहेत.कोरोनाच्या तिन्ही लाटेत कोरोना मृत्यूंचे प्रमाण हे दिवसाला सरासरी दोन ते चार इतके होते. मात्र तिसरी लाट ओसरल्यानंतर आता मृत्यूंचे हे सत्र थांबले आहे. गेल्या 50 दिवसांत शहरात कोरोनाचा एकही मृत्यू झालेला नाही.

कोरोनाची तिसरी लाट झपाट्याने वाढली व तितक्याच वेगाने ओसरली आहे. दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे. डिसेंबर 24 पासून सुरू झालेली तिसरी लाट तितक्याच वेगाने ओसरल्यामुळे दिलासा मिळाला आहे. एकंदरीतच कोरोनाच्या कार्यकाळात आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू 60 वर्षांवरील नागरिकांचेच झाले आहेत.

नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण 13 मार्च 2020 रोजी सापडला तर पहिला मृत्यू 15 मार्च 2020 रोजी झाला. तेव्हापासून दोन वर्षे कोरोनाचे शहरात थैमान सुरू होते. यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

0 ते 10 वयोगटातील फक्त एका मुलाचा करोनामुळे मृत्यू झाला तर सर्वाधिक मृत्यू ज्येष्ठ नागरिकांचे झाले आहेत.तिसर्‍या लाटेत कमी कालावधीत मोठया प्रमाणात रुग्ण वाढल्याने पुन्हा शहरातील करोना केंद्रे सुरू करण्यात आली व महिनाभरातच वाशी वगळता इतर केंद्रे बंद करण्यात आली. शहरात 1 लाख 51 हजारांच्या पुढे करोनामुळे बाधितांची संख्या झाली असून 2049 इतके मृत्यू झाले. आता गेले 50 दिवस शहरात एकही करोना मृत्यू झालेला नाही.

नवी मुंबई शहरात मागील दोन वर्षांत दैनंदिन रुग्णसंख्या शून्यावर आली. कोरोनाची स्थिती अत्यंत नियंत्रणात आहे. मागील जवळजवळ 50 दिवसांत एकाही नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला नाही, ही समाधानकारक बाब आहे. पालिका प्रशासनाचे प्रयत्न व नागरिकांचे सहकार्य यामुळेच कोरोनावर मात करण्यात पालिकेला यश प्राप्त झाले आहे.

-अभिजीत बांगर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply