Breaking News

फळांचा राजा जनतेच्या दरबारात

आवक वाढली; दरही आता नियंत्रणात

नवी मुंबई :  रामप्रहर वृत्त

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. आतापर्यंत 1280 टन आंब्याची आवक झाली असून त्यामध्ये 55 हजार पेट्या व 25 हजार क्रेटचा समावेश आहे. आवक वाढल्यामुळे आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत.

बाजार समितीमध्ये प्रत्येक वर्षी आंबा हंगामात जवळपास 500 कोटी रुपयांची उलाढाल होत असते. मार्च ते जूनदरम्यान बाजारपेठेवर आंब्याचे वर्चस्व असते. या वर्षीही 15 एप्रिलपासून आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून मोठ्या प्रमाणात हापूसची आवक सुरू आहे. कर्नाटकमधूनही आवक वाढली आहे. हापूसव्यतिरिक्त बदामी, लालबाग, तोतापुरी आंबाही विक्रीसाठी येत आहे.

गेल्या आठवड्यात 5 ते 8 डझन वजनाच्या पेटीसाठी होलसेल मार्केटमध्ये 2000 ते 5500 रुपये दर मिळत होता. आता हेच दर 1200 ते 4000 वर आले आहेत. कर्नाटकचा आंबा गेल्या आठवड्यात 200 ते 225 रुपये किलो दराने विकला जात होता. आता त्याचे दर 80 ते 120 रुपये  किलो झाले आहेत.

सर्वसामान्यांना दिलासा

इतर आंब्याचे दरही नियंत्रणात आले आहेत. दर नियंत्रणात आल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांनाही आंब्याचा स्वाद घेता येणार आहे. पुढील दीड महिना आवक मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यापार्‍यांनी व्यक्त केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply