नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
खालापूर : प्रतिनिधी
पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. मात्र खोपोली नगर परिषद प्रशासन पावसाळ्यापुर्वीची नालेसफाई व वार्डातील साफसफाई करण्यास असमर्थ ठरले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात खोपोलीतील सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खोपोलीत अत्यावश्यक सेवेबरोबरच मान्सूनपुर्व कामांकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्लॉस्टिक बाटल्या, झाडे-झुडपे, कचरा यांनी खोपोलीतील नाले, गटारे तुंबली असून, प्रत्येक प्रभागात दुर्गंधी पसरली आहे. शहरातील विणानगर, वैभवनगर व परिसरातील सखल भागात पावसाळ्यात नेहमीच पावसाचे पाणी साठून रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यावर्षीही हीच परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मान्सूनपुर्व कामांकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.
खोपोलीतील नालेसफाई व मान्सूनपुर्व कामे येत्या काही दिवसांत युद्धपातळीवर हाती घेण्यात येतील.
-अनूप दुरे, मुख्याधिकारी, खोपोली नगर परिषद
RamPrahar – The Panvel Daily Paper