अलिबाग : प्रतिनिधी
रायगडच्या समुद्रकिनार्यावर बुधवारी (दि. 15) मोठी भरती आली होती. या वेळी समुद्र प्रचंड खवळला होता. फेसाळणार्या महाकाय लाटा किनार्यावर धडकत होत्या. या लाटांचा आस्वाद लुटण्यासाठी स्थानिक तसेच पर्यटकांनी अलिबाग किनार्यावर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, गुरुवारी समुद्राला या वर्षीचे सर्वांत मोठे उधाण येणार आहे.
मान्सूनने आपली दस्तक दिली असून किनारपट्टीवर समुद्राला उधाण येत आहे. पौर्णिमेनंतर बुधवारी समुद्राला मोठी भरती आली होती. साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची ही भरती असल्याने मोठ्या लाटा उसळत होत्या. वार्याचा जोरही कायम असल्याने वेगाने येणार्या या लाटा किनारपट्टीवर धडकत होत्या. त्यामुळे काही ठिकाणी परिसर जलमय झाला होता. रायगड जिल्ह्यातील मांडवा, सासवणे, किहीम, वरसोली, अलिबाग, आक्षी, नागाव, काशिद आणि मुरूड परीसरात दुपारी महाकाय लाटा धडकल्या. या लाटा पाहण्यासाठी उत्साही पर्यटकांनी समुद्र किनार्यांवर मोठी गर्दी केली होती.
पावसाळ्यापूर्वी समुद्राला येणार्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाज बंदर विभागामार्फत जाहीर केले जातात. या वर्षी पावसाळ्यात 22 दिवस मोठी उधाण येईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये 16 जून आणि 15 जुलै रोजी सर्वांत मोठ्या म्हणजे 4.87 मीटरच्या लाटा उसळणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
Check Also
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला आमदार प्रशांत ठाकूर यांचे जोरदार समर्थन
विधीमंडळ सभागृहात जाहीर केला पाठिंबा मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यात जबदस्तीने किंवा प्रलोभनाव्दारे धर्मांतर रोखण्यासाठी सरकारने …
RamPrahar – The Panvel Daily Paper