देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
पंढरपूर : प्रतिनिधी
राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार आहे आणि त्यानंतर भाजप लगेचच स्वबळावर सत्ता स्थापन करेल, असे राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते मंगळवारी (दि. 24) पंढरपूर येथे बोलत होते. नव्या सरकारसाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचेही त्यांनी पुढे नमूद केले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी पंढरपूर येथे आले होते. असले सरकार चालत नसते असे सांगताना आम्हाला कोणतीही घाई नाही. तुम्ही फक्त वाट बघा, असे ते म्हणाले.
ईडीने मनी लॉड्रिंगप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले. सरनाईक यांचे पुत्र विहंग यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपला लक्ष्य केले. त्यावर फडणवीस यांनी पलटवार केला. संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर जाऊन आम्हाला बोलता येते. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो, मात्र आमची ती संस्कृती नाही असे सांगताना जी कारवाई होत आहे त्याच्या केवळ भीतीपोटी राऊत बोलत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केलीच तर कोर्ट सोडेल का, असा सवालही फडणवीस यांनी केला.
चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्यावर काय होते हे अर्णब गोस्वामी प्रकरणात सुप्रीम कोर्टात पाहायला मिळाले आहे, असेही फडणवीस म्हणाले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराचे एकतरी प्रकरण दाखवा, असे आव्हान देताना असा गैरवापर केला असता तर परिस्थिती वेगळी दिसली असती, असे फडणवीस यांनी सांगितले. पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री कधीही या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
सध्या राऊतांना बिहार दिसू लागले असून, सत्तेत आल्यावर शिवसेना व राऊत कसे बदलत गेले हे लव्ह जिहाद प्रकरणावरून दिसतेय असे सांगताना 2014मध्ये व्हॅलेंटाइन डे दिवशी बसणार्या जोडप्यांना मारहाण करणारी शिवसेना आता लव्ह जिहादबाबत अग्रलेख लिहितेय हे पाहून गंमत वाटते, असा टोला फडणवीसांनी लगावला. राऊत देत असलेल्या फालतू धमक्यांना आम्ही भीक घालत नाही, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, फडणवीस यांनी जेष्ठ नेते दिवंगत सुधाकर परिचारक यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि नंतर भागवताचार्य दिवंगत वा. ना. उत्पात यांच्या घरीही त्यांनी भेट दिली. त्याचप्रमाणे कार्तिकी एकादशीसाठी घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिरात न जाता नामदेव पायरी जवळूनच विठ्ठलाचे दर्शन त्यांनी घेतले. आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते-पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, रणजीत निंबाळकर, जयसिद्धेश्वर स्वामी, लक्ष्मण ढोबळे या वेळी उपस्थित होते.