गुवाहाटी : आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आम्ही इकडे आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. महाराष्ट्रात आमचे कार्यालये फोडली जाते आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल, तेव्हा आम्ही मुंबईत येऊ, असे शनिवारी (दि. 25) बंडखोर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.
आम्ही महाराष्ट्रातून इकडे आल्यानंतर माध्यमांशी खूप कमी बोललो. मला एकनाथ शिंदे यांनी तुम्ही माध्यमांशी अधिकृत बोला असे सांगितले आहे. काही दिवसांपासून सर्वांचा एक गैरसमज आहे की, आम्ही शिवसेनेत आहोत की नाही? आम्ही शिवसेनेतच आहोत. त्यामुळे कोणी वेगळी चर्चा करण्याची गरज नाही, असे आमदार केसरकर यांनी नमूद केले. जेव्हा आम्ही आमदार इकडे आलो तेव्हापासून महाराष्ट्रात वेगळे चित्र निर्माण झाले आहे. लोकांना रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले जाते आहे. हे चुकीचे आहे. कोणीही रस्त्यावर उतरण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.
आमदार केसरकर पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना आम्ही अनेक वेळा सुचवले होते की, आपण ज्यांच्यासोबत होतो त्यांच्यासोबत राहू नये. आपल्या पक्षाची अधोगती होत आहे. अनेक जणांनी ही गोष्ट त्यांना सांगितली होती, पण तरीदेखील त्यांनी याकडे लक्ष दिले नाही. एवढे लोक सांगतात म्हणजे त्यामध्ये तथ्य आहे ना? मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला तो आम्हाला मान्य नाही. आमचा नेता हा एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आमच्या गटाचे नाव अजून ठरलेले नाही. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत. घटनात्मक तरतुदीनुसार दोन तृतीयांश सदस्य आमच्याकडे आहेत. त्यामुळे आम्ही ‘फ्लोअर टेस्ट’ला केव्हाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.
Check Also
उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!
पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …
RamPrahar – The Panvel Daily Paper