उरण : वार्ताहर
दडी मारलेल्या पावसाने अखेर दमदार सुरुवात केल्याने उरण तालुक्यात खाडी किनारी चिवणी मासे पकडण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या माशांची गाभोळी (अंडी) खाण्याची मजा काही औरच असते. त्यामुळे मासांहारी खवय्यांची मोठी पसंती या माशांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पावसाळा सुरू झाला की उरण तालुक्याच्या पूर्व भागात वलगणीचे मासे मोठ्या प्रमाणात मिळतात. सुरुवातीच्या पावसात हे मासे आपली अंडी सोडण्यासाठी समुद्रातून नदी, नाले, शेतीत येतात.
या वर्षी पाऊस उशिरा पडल्याने मत्स्यखवय्यांना चिवण्यांची गाभोळी खायला थोडा विलंब झाला, पण आता मासळी बाजारात चिवणी माशांची आवक वाढली आहे. ग्राहकदेखील या माशांवर तुटून पडत आहेत. 10 माशांचा वाटा गेल्या वर्षी शंभर रुपयाला मिळायचा. या वर्षी शंभर रुपयाला चार ते पाच मासेच मिळत आहेत.
एकेकाळी उरण तालुका म्हणजे मासळीचे आगर म्हणून ओळखला जात असे, मात्र औद्योगिकीकरण, भूसंपादन, पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद होणे यांसारख्या कारणामुळे येथील मासळी मिळण्याचे प्रमाण फार कमी झालेे आहे. तरीदेखील मिळेल ती मच्छी पकडून बाजारात विकली जात आहे. यामध्ये पावसाच्या सुरुवातीला मिळणार्या वळगणी खरेदीकडे खवय्यांचा अधिक कल दिसून येत आहे.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper