Breaking News

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणची कसरत

नदीच्या पाण्यातून नेले लोखंडी खांब; कर्मचार्‍यांची कार्यतत्परता

कर्जत : बातमीदार

मुसळधार पावसात खोपोली-कर्जत मार्गालगतचे चार खांब कोसळमुळे कर्जत तालुक्यातील पळसदरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणच्या कर्मचार्‍यांनी पावसातही नवीन लोखंडी खांब नदीपलिकडे नेऊन उभे केल्यावर तीन दिवसानंतर त्या भागातील वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला. महावितरण कर्मचार्‍यांच्या   धाडस व मेहनतीचे कौतुक होत आहे.

खोपोली इन्कमरचा वीज प्रवाह वाहून नेणारे खोपोली-कर्जत मार्गालगतचे चार खांब मुसळधार पावसामुळे गुरुवारी (दि. 7) कोसळले होते. त्यामुळे पळसदरी भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. ज्या ठिकाणी विजेचे खांब कोसळले होते तेथे नवीन खांब नेण्यासाठी नदी पार करावी लागणार होती. सध्या पावसामुळे नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे या कार्यात अडथळे निर्माण झाले होते, मात्र वीजपुरवठा सुरु करणे गरजेचे असल्याने महावितरण कर्मचार्‍यांच्या पथकाने चार नवीन लोखंडी खांब नदीपलीकडे नेण्याचा निर्णय घेतला.

महावितरणचे कर्जत विभागाचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता प्रकाश देवके यांनी साहित्य व मनुष्यबळाचे योग्य नियोजन केले. महावितरण आणि ठेकेदाराचे अशा एकूण 30 कर्मचार्‍यांनी युद्धपातळीवर कामाला सुरुवात केली. भर पावसात एकूण 400 किलो वजनाचे लोखंडी खांब खांद्यावर या कर्मचार्‍यांनी जोराबेन येथील नदी पार केली व नवीन विद्युत खांब उभे केले. या खांबांवरून वीजवाहिन्या टाकल्यावर पळसदरी भागातील गावांचा वीजपुरवठा पुर्ववत सुरू झाला होता. या कामाबद्दल  महावितरणच्या भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औढेंकर यांनी कर्मचार्‍यांचे कौतुक केले आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply