Breaking News

पालिकांच्या निवडणुका पुढे ढकला

भाजप शिष्टमंडळाची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात सध्या ठिकठिकाणी अतिवृष्टी होत असून नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे स्थानिकांचा संपर्क तुटला आहे. अशा स्थितीत राज्य निवडणूक आयोगाने 92 नगर परिषदा, चार नगरपंचायती व 15 ग्रामपंचायतींमधील निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि. 11) मुंबईत राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांच्याकडे केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय होऊ नयेत, अशी भाजपची भूमिका असून निवडणुका पुढे ढकलल्यास हे आरक्षण पुन्हा लागू करण्यास सवड मिळेल, असे मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आयोगाच्या कार्यालयाबाहेर पत्रकारांना सांगितले.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या समवेत माजी मंत्री गिरीश महाजन, प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, जयकुमार रावल, सुनील कर्जतकर, सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व माजी मंत्री सदाभाऊ खोत उपस्थित होते. याचबरोबर राज्यातील विविध नगरपालिकांच्या क्षेत्रातील स्थानिक भाजप आमदार आणि स्थानिक नेते राज्य निवडणूक आयुक्तांसोबतच्या बैठकीस उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष पाटील पुढे म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगाने दोन दिवसांपूर्वी अचानक 92 नगरपालिका, चार नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यानुसार 20 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधी निवडणूक कार्यक्रम असेल. हा सर्व पावसाचा कालावधी आहे. सध्या राज्यात अतिवृष्टीमुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना निवडणूक अर्ज दाखल करणे, प्रचार करणे आणि मतदारांनी मतदान करणे अवघड होणार आहे. त्यामुळे आयोगाने हा निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी विनंती आम्ही केली. राज्य निवडणूक आयुक्तांनी याबाबत शहरानुसार फेरआढावा घेण्याचे आश्वासन दिले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करताना पावसाचा अंदाज घ्यावा, असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे. आयोगाने पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असला तरी वस्तुस्थितीचा विचार करावा, असे आमचे म्हणणे आहे. 2019 व 2021 अशी दोन वर्षे कराड शहराचा बहुतांश भाग काही आठवडे पाण्याखाली होता, तर गेल्या वर्षी कागल शहराचा पंधरा दिवस पावसामुळे परिसराशी संपर्क तुटला होता. ही दोन उदाहरणे ध्यानात घेतली, तर पावसाच्या बाबतीत वस्तुस्थिती लक्षात येईल, याकडे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी लक्ष वेधले आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply