खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी बोटी झाल्या सज्ज
मुरूड ः प्रतिनिधी
मुरूड तालुक्यात सोमवार (दि. 1)पासून मासळीचा हंगाम सुरू असल्याने सुमारे 650 छोट्या-मोठ्या बोटी मासेमारी करण्यसाठी सज्ज झाल्या आहेत. 1 जून ते 31 जुलै हा मासेमारी बंदीचा कालावधी समाप्त झाला आहे. आता पुन्हा नव्याने मासेमारी करण्यासाठी मच्छीमार तयार झाले असून मोठ्या अपेक्षेने नवीन हंगामाची सुरुवात करताना ते दिसत आहेत.
दोन महिन्यांपासून बोटी किनार्याला शाकारून ठेवण्यात आल्या होत्या. आता या बोटींवरील आच्छादलेले मेणकापड अथवा ताडपत्री काढण्यात आली असून बोटीचे इंजिन, रंगरंगोटी, बोटींची पडताळणी, मशीनची स्थिती या सर्व पडताळून बोटी खोल पाण्यात मासेमारीसाठी जाणार आहेत. बोटी पाण्यात जाण्यापूर्वी मासे पकडण्यासाठी जे जाळे असते त्याची तपासणी करून गुंतलेले जाळे व्यवस्थित सोडवले जाते व तद्नंतर बोटीमध्ये ठेवले जाते.
या वर्षी ऐन मे महिन्यात माशांची आवक घटल्यामुळे मे महिन्यातच बोटी किनार्याला शाकारून ठेवण्यात आलेल्या होत्या, परंतु यंदाचा 1 ऑगस्टपासून होणारा माशांचा मौसम तरी चांगला जावा व मुबलक मासे मिळावेत या अपेक्षेने मच्छीमार नव्या दमाने खोल समुद्रात जाताना दिसत आहेत. मच्छीमार मागील दोन वर्षांपासून मुबलक मासळी न मिळाल्यामुळे कर्जाचा बोजासुद्धा वाढला आहे. श्रावण महिना सुरू झाला की, पापलेट ही चविष्ठ मासळी मोठ्या प्रमाणात मिळत असते. मासेमारांना जर पापलेट मोठ्या प्रमाणात मिळाले तर खूप मोठा आर्थिक फायदा मिळून कर्ज कमी होण्यास मदत मिळणार आहे. पापलेट मासळीला खूप चांगला दरसुद्धा मिळत असतो.
समुद्र शांत राहण्याची प्रार्थना
याबाबत रायगड जिल्हा मच्छीमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले की, मासळीचा हंगाम सुरू झाला असून समुद्र खूप शांत आहे. समुद्र शांत राहिला तर मासेमारी व्यवस्थित करता येऊन मुबलक मासळी मिळणार आहे. या महिन्यात समुद्र हा खवळलेला असतो, परंतु सध्या समुद्र शांत असल्याने आहे. थोडी भीतीसुद्धा आहे. अचानकपणे समुद्रात वादळ निर्माण होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. असे होऊ नये ही ईश्वरचरणी सर्व मच्छीमार प्रार्थना करीत आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper