मुंबई : प्रतिनिधी
राज्यात विविध जिल्ह्यांतील तब्बल सात हजार 750 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली असून 20 डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी बुधवारी (दि. 9) केली.
राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान यांनी सांगितले की, ऑक्टोबर 2022 ते डिसेंबर 2022 या कालावधीत मुदत संपणार्या तसेच नव्याने स्थापित अशा सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 18 डिसेंबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार असून नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल, तर मतमोजणी 20 डिसेंबर रोजी होईल.
निवडणूक होणार्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
अहमदनगर 203, अकोला 266, अमरावती 257, औरंगाबाद 219, बीड 704, भंडारा 363, बुलडाणा 279, चंद्रपूर 59, धुळे 128, गडचिरोली 27, गोंदिया 348, हिंगोली 62, जळगाव 140, जालना 266, कोल्हापूर 475, लातूर 351, नागपूर 237, नंदुरबार 123, उस्मानाबाद 166, पालघर 63, परभणी 128, पुणे 221, रायगड 240, रत्नागिरी 222, सांगली 452, सातारा 319, सिंधुदुर्ग 325, सोलापूर 189, ठाणे 42, वर्धा 113, वाशीम 287, यवतमाळ 100, नांदेड 181 व नाशिक 196.
Check Also
उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास
आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …