खोपोली, खालापूर : प्रतिनिधी
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोलीनजीक ढेकू गावाच्या हद्दीत गुरुवारी (दि. 17) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एर्टिगा कारने पुढे जाणार्या अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील सहा जणांचा मृत्यू, तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमींना कामोठे एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्याहून मुंबईकडे येणार्या एर्टिगा कार (एमएच 14-ईसी 3501)मध्ये आठ प्रवासी होते. ही कार गुरुवारी रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी ढेकू गावाच्या हद्दीत आल्यावर कारचालक मच्छिंद्र अंभोरे याचे नियंत्रण सुटले. त्यामुळे कार पुढे जाणार्या अज्ञात वाहनावर धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, कारमधील चार प्रवाशांचा जागीच, तर दोघांचा रुग्णालयात दाखल करताना मृत्यू झाला.
अब्दुल रहमान खान (वय 32, रा. घाटकोपर), अनिल सुनील सानप, वासिम साजिद काजी (रा. राजापूर, जि. रत्नागिरी), राहुल कुमार पांडे (वय 30, रा. कामोठे, ता. पनवेल), आशुतोष नवनाथ गाडेकर (रा. मुंबई) आणि अमीर उल्ला चौधरी हे कारमधील प्रवासी या अपघातात मयत झाले आहेत. कारचालक मच्छिंद्र आंबोरे आणि दीपक खैराल हे जखमी आहेत. सुदैवाने अस्मिया चौधरी (वय 25, रा. कुर्ला, मुंबई) या बचावल्या आहेत.
अपघाताचे वृत्त समजताच आयआरबी यंत्रणा, देवदूत महामार्ग पोलीस, खोपोली पोलीस, डेल्टा फोर्स, लोकमान्य रुग्णालय, आणि खोपोलीतील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
खालापूर उपविभागीय अधिकारी संजय शुक्ल, खोपोली पोलीस निरीक्षक शिरीष पवार, उपनिरीक्षक योगेश भोसले यांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी सुरू केली आहे.
Check Also
पनवेलमध्ये एसआयआर कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा
पनवेल ः रामप्रहर वृत्तभारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या मतदार याद्यांचा विशेष …
RamPrahar – The Panvel Daily Paper