पनवेल : प्रतिनिधी
शैक्षणिक तसेच विविध योजनांचा लाभ आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असतो. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना सुविधांचा लाभ मिळण्यासाठी आधारकार्ड संदर्भातील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी नागपूर येथे सुरु असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली. त्यावर एकही विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहणार नाही, यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल असे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना आश्वासित केले.
महाराष्ट्र विधानसभा नियम १०५ अन्वये सार्वजनिक महत्वाच्या व निकडीच्या बाबीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या सभागृहात लक्षवेधी सूचना मांडली. त्यांनी आपल्या लक्षवेधी सूचनेत म्हंटले कि, “राज्य शासनाने संच मान्यतेसाठी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती सरल प्रणालीवर भरणे शाळांना बंधनकारक केले असून आधारकार्ड वरील तपशिलात त्रुटी असल्याने रायगड जिल्ह्यातील जवळपास ४९ हजार ४८४ विद्यार्थ्याकडे आधारकार्ड नसल्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. आधारकार्डची नोंदणी बंधनकारक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढणे व आधारकार्डवरील चुकांची दुरूस्ती करण्याचे काम शिक्षक व मुख्याध्यापकांनी करणे आवश्यक असल्याने या कामामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण देताना शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच शैक्षणिक तसेच विविध योजनांचा लाभ आधारकार्ड असलेल्या विद्यार्थ्यांना मिळत असते, त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये शासनाच्या या निर्णयामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून याबाबत शासनाने तातडीने लक्ष घालून आवश्यक कार्यवाही व उपाययोजना करावी, अशी मागणी या लक्षवेधी सुचनेतून केली. पुढे बोलताना, आधारकार्ड संदर्भात शासनाने डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे उद्देश केले आहे. जर डिसेंबर २०२२ पर्यंत हे काम पूर्ण झाले नाही तर आधारकार्ड नसलेल्या किंवा लिंक न झालेल्या अशा विद्यार्थ्यांचे आयडेंटीफाईड करून त्यांना आधारकार्ड मिळण्यासाठी शासन विशेष मोहीम राबवणार आहे का? सवाल करतानाच सरल योजनेचे नोंदले न गेलेले विद्यार्थ्यांना आज लागू असलेल्या सगळ्या योजनांचा लाभ मिळेल याची शासनाने हमी घेण्यासंदर्भातही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या लक्षवेधीतून मागणी केली.
राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी सांगितले कि, सरल प्रणालीमध्ये प्रत्येक विद्यार्थी नावासहित नोंदवलेला असतो. त्या प्रत्येक विद्यार्थ्यंला सुविधा देत असतो. आधारकार्ड लिंकिंग अनिवार्य असल्याने तशी यंत्रणा कार्यान्वित असून ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत रायगड जिल्ह्याचे काम पूर्ण करण्यात येईल. आधारकार्ड संदर्भात केंद्र सरकारची यंत्रणा असलेल्या आयटीआय हे काम करीत असून प्रत्येक तालुक्याला दोन मशिन्स देण्यात आल्या आहेत तसेच त्यांना अतिरिक्त जी काही मदत लागेल ती देण्याच्या अनुषंगाने कार्यालयांना सुचना देण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात ५ लाख १४ हजार १२९ विद्यार्थी आहेत त्यापैकी ५ लाख ३ हजार ८६३ आधारकार्डचे लिंक झाले आहेत. उर्वरित १० हजार २६६ विद्यार्थ्यांच्या आधारकार्ड संदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाईल. तसेच आधारकार्ड लिंक करण्यास काही अडचण असतील तर त्यांना अधिकचा वेळ द्यावा लागला तर दिला जाईल आणि एकही विद्यार्थी सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सभागृहात आश्वासित केले.