पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी नेहमीच अग्रेसर असते. या वर्षी ‘अभाविप’ अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असून त्यानिमित्ताने परिषदेच्या उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने ‘छात्रगर्जना ः जयघोष विद्यार्थी नेतृत्वाचा’ हे जिल्हास्तरीय विद्यार्थी संमेलन मंगळवारी (दि. 28) सकाळी 9 वाजता पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले आहे.
या संमेलनाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येेणार असून या वेळी आदर्श शैक्षणिक समूहाचे चेअरमन धनराज विसपुते व मुंबई विद्यापीठाचे अधिसभा सदस्य मयुरेश नेतकर उपस्थित असतील तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वाय 20 समूहाचे केंद्र सरकारचे सचिव आकाश झा, एकता निराधार संघाचे प्रमुख सागर रेड्डी व अभाविपचे कोकण प्रदेश सहमंत्री कृष्णा दुबे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असणार आहेत.
या जिल्हा संमेलनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उद्भवणारे प्रश्न, समस्या याबाबत व्यापक चर्चा होणार असून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठी दोन प्रस्ताव पारित करण्यात येणार असून वर्षभर त्यांचा पाठपुरावा करण्यात येईल तसेच विद्यार्थ्यांना सामाजिक विषयात तज्ज्ञ मार्गदर्शनदेखील या जिल्हा संमेलनात लाभणार आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने या जिल्हा संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संयोजक वैष्णव देशमुख यांनी केले.
Check Also
केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार
पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …
RamPrahar – The Panvel Daily Paper