पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथे असलेल्या टाटा मेमोरियल रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही होण्यासंदर्भात उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांची नवी दिल्लीत भेट घेतली.
कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही, तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार महेश बालदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे या रुग्णालयातील रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या मागणीनुसार केली होती. या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे संवाद साधत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने टाटा हॉस्पिटलमधील मनुष्यबळाची संख्या तब्बल 2405, तर रुग्ण खाटांची संख्या 930 करण्यात येणार आहे. त्यानुसार पुढील कार्यवाहीसाठी ही भेट महत्त्वाची होती.
कर्करोग रुग्णांची परिस्थिती आणि उपचार या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती. त्या अनुषंगाने नोव्हेंबर 2022मध्ये या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वाढीव रुग्ण बेड आणि आणि मनुष्यबळाची मागणी करण्यात आली. त्या अनुषंगाने त्यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याकडे त्या संदर्भातील संवाद आणि पाठपुरावा केला होता. त्यानुसार अवघ्या तीन महिन्यांत मोदी सरकारने रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय घेतला असून पुढील तातडीच्या कार्यवाहीसाठी या वेळी चर्चा झाली.
Check Also
आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश
पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …
RamPrahar – The Panvel Daily Paper