Breaking News

सर्वसमावेशक अर्थसंकल्पाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन अन् आभार!

मुंबई ः रामप्रहर वृत्त

राज्याचा सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर झाल्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी पनवेल, उरणसह रायगड जिल्ह्याला पुढील काळात आवश्यक असलेल्या बाबींचा उल्लेख करीत तशी मागणीही या वेळी केली.

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर सभागृहात बोलताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराला आदर्श व शिरोधार्य मानून या महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान, ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीय आणि सर्व समाज घटकांचा विकास घडविण्याच्या दृष्टिकोनातून काम सुरू आहे. एकीकडे शाश्वत शेती, तर दुसरीकडे युवकांच्या हाताला काम देण्यासाठी, पर्यावरणाचा समतोल, पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी या महाराष्ट्राचा जो पंचतीर्थ असा अर्थसंकल्प मांडलाय त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो आणि अर्थसंकल्पाला पाठिंबा देतो. यंदाचे हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे साडेतीनशेवे वर्ष आहे आणि शिवरायांची राजधानी असलेल्या रायगडावर विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवराय या महाराष्ट्राचा श्वास आहे, या महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि म्हणूनच या राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या पुढच्या पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील अशा पद्धतीने हा सोहळा संपन्न व्हावा यासाठी साडेतीनशे कोटी रुपयांची तरतूद ही होणार आहे, त्याबद्दल मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे मनापासून अभिनंदन करतो.

देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी सन 2014 साली सूत्रे स्वीकारली आणि तेव्हापासून आपल्या देशाने विकासाची नवी दृष्टी स्वीकारलेली आहे. त्यामुळे संपूर्ण देश कोणाच्या मेहरबानीची प्रतीक्षा न करता प्रत्येक राज्य हे स्वतःच्या क्षमतांचा विकास करीत या प्रगतीची कास स्वीकारतोय आणि याच दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून 2014 साली ज्या वेळेला  देवेंद्र फडणवीस यांनी सूत्र स्वीकारली त्यानंतर या महाराष्ट्राने एका अर्थाने कात टाकली. पाण्याचा तुटवडा होता. लातूरसारख्या ठिकाणी ट्रेनने पाणी न्यावे लागत होते. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून महाराष्ट्राने जी भूमिका स्वीकारली त्यामुळे अनेक गावे आता दुष्काळमुक्त झाली. महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचे एका अर्थाने आव्हान देवेंद्रजींनी स्वीकारलेले होते. त्या दुष्काळाला भूतकाळ करण्याच्या साठी पावले टाकायला महाराष्ट्राने सुरुवात केली. विजेचे भारनियमन होते. आज भारनियमनमुक्त अशा पद्धतीचा महाराष्ट्र आपल्याला पाहायला मिळतोय. मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या माध्यमातून बेरोजगाराला चालना देण्याचे काम देवेंद्रजींनी स्वीकारले आणि गृहमंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे उपाययोजना करीत या महाराष्ट्रामधला कन्वेक्शन रेट वाढला पाहिजे, त्याच्यातून गुन्हेगारी संपेल. फॉरेन्सिक लॅब असतील त्याच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी साबित करण्यासाठी पुढाकार घेतला आणि आता 2019नंतर जरी अडीच वर्षे खंड पडला असला तरी आता पुन्हा नव्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्र दमदारपणाने पाऊल टाकत पुढे जाणार आहे आणि म्हणून आपण पाहतोय अनेक पावले या महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी उचललेली आहेत. अनेक विषय सांगता येतील, पण माझ्या रायगड जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे म्हणजे मच्छीमारांसाठी जिथे प्रकल्पबाधित मच्छीमार आहे त्यांच्यासाठीचे एक धोरण पहिल्यांदाच देशामध्ये आणले जात आहेत आणि म्हणून मत्स्य विकासकोष याची स्थापना केली गेली. प्रत्येक प्रकल्पाच्या प्रकल्प कॉस्ट आहे. प्रोजेक्ट कॉस्टच्या दोन टक्के किंवा 50 कोटी रुपये इतकी घसघशीत रक्कम दिली जाणार आहे. मी मागणी करीत आहे की याच्या पुढच्या कालावधीमध्ये याची तरतूद होईल, पण आज या ठिकाणी ज्या प्रलंबित मागण्या आहेत. धरमतर खाडी मच्छीमारांनी मागणी केलेली आहे. त्यांच्यासाठीसुद्धा या अशा पद्धतीची तरतूद लागू झाली पाहिजे. मच्छीमारांना सरसकट डिझेल अनुदान दिले जाणार आहे. पारंपरिक मच्छीमारांना पाच लाख रुपयांपर्यंतचा विमा दिला जाणार आहे त्याचे मी स्वागत करतो. पीक विमाच्या बाबतीमध्ये तर संपूर्ण महाराष्ट्र स्वागत करेल की, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनासुद्धा फायदा होणार आहे. अवकाळी पाऊस येतो, अतिवृष्टी होते. अशा वेळेला शासनाच्या माध्यमातून या पीक विम्यासाठीचा प्रीमियम भरला जाणार आहे याचे निश्चितपणाने सर्व शेतकरी स्वागत करीत आहेत.

सध्या सुरू असलेली हर घर जल घर ही जी योजना आहे याच्यामध्ये काही ठिकाणी योजनांच्या नियोजनामध्ये त्रुटी राहिल्या. 2024पर्यंत या योजना पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यायचा होता. अशा वेळेला काही ठिकाणी स्रोत आहेत त्या स्रोतांचा विचार न करताच त्या योजना अर्धवट आखल्या गेल्यात या पूर्णपणे आखल्या जाण्यासाठी यामध्ये अ‍ॅडिशन करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून यासाठी मी या ठिकाणी मागणी करतो की, यांचा विचार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातूनदेखील झाला पाहिजे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून दीड लाखाऐवजी आता पाच लाखापर्यंतचे कव्हरेज दिले जाणार आहे. त्यामुळे मी विनंती करेन की जनगणना न झाल्यामुळे अनेक या ठिकाणी परिस्थितीने गरीब आणि ज्यांना ज्यांना कव्हरेज मिळत नाहीत अशा कुटुंबांना या योजनेचा फायदा मिळण्यासाठी शासनाने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. रायगड आणि ठाणे जिल्हा लोकसंख्येने मोठा आहे. अशा जिल्ह्यांना या ठिकाणी वेगवेगळ्या योजनांचा लाभ अधिक प्रमाणात मिळाला पाहिजे. तिथल्या लोकसंख्येला या योजनांचा फायदा झाला पाहिजे. मग हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने आपला दवाखाना योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विनामूल्य चाचण्या चिकित्सा उपचार होणार आहेत. मग यामध्ये प्रत्येक तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे, पण काही ठिकाणी तालुक्याच्या मुख्यालयाइतकेच महत्त्वाचे शहर आहेत त्याही ठिकाणी या पद्धतीचे दवाखाने वाढीव स्वरूपात मिळाले पाहिजेत. विरार ते अलिबाग या मल्टीमॉडेल कॉरिडॉरची घोषणा केली गेली आहे. रेवस ते रेडी या सागरी महामार्गावरची घोषणा केली गेलेली आहे. मेट्रो मार्ग 12 की ज्यामध्ये कल्याण ते तळोजा या 20.75 किलोमीटर लांबीच्या या ठिकाणी मेट्रोमार्ग होणार आहे. 5865 कोटी रुपये या मार्गासाठी दिले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये बहुतांश ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकल्प येतात. आमच्या पनवेल, उरण तालुक्यामध्ये अनेक प्रकल्प येतात. अशा वेळेला या प्रकल्पांमुळे जे लोक प्रकल्पबाधित होणार आहेत त्यांना तिथे जो रोजगार निर्माण होतो. मग केंद्र शासनाचे प्रकल्प असतील किंवा राज्य सरकारचे प्रकल्प असतील यामध्ये त्या प्रकल्पबाधिताला विशेष स्थान मिळाले पाहिजे. त्या प्रकल्पबधिताला नोकरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी सामावून घेतले पाहिजे, त्याचे पुनर्वसन झाले पाहिजे यासाठी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तरतूद झाली पाहिजे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले.

मी सरकारचे अभिनंदन करतो की स्टार्टअपच्या साठीचे प्रकल्प आहेत याच्या निवासी प्रशिक्षण आणि संशोधनाची संस्था कळंबोली या ठिकाणी होणार आहे. अशाच पद्धतीने वेगवेगळ्या प्रकल्पांच्या प्रकल्पबाधितांना संरक्षण आणि तेही विशेषत्वाने रायगड जिल्ह्यामध्ये जे विशेष प्रकल्प येतात त्या अनुषंगाने चांगल्या पद्धतीचे कॉम्बिनेशन मिळावे आणि त्याचबरोबर त्यांना या व्यवसायामध्ये मोठ्या प्रकल्पामध्ये सामावून घेण्यासाठी पुढाकार घेतला जावा. अनेक चांगल्या चांगल्या गोष्टी या अर्थसंकल्पामध्ये होतात. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्वागत करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदयांचे अभिनंदन करतो, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद करीत रायगड जिल्ह्यातील नागरिकांना जास्तीत जास्त सेवा मिळण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहात मागणी केली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply