मुंबई : प्रतिनिधी
राज्य सरकार आणि शेतकर्यांच्या शिष्टमंडळाची चर्चा होऊन तोडगा निघाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येत असलेला किसान लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य सरकारने आमच्या 70 टक्के मागण्या मान्य केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तशी माहितीही दिली आहे. त्यामुळे आम्ही आंदोलन स्थगित करीत असल्याची माहिती शेतकरी नेते जे. पी. गावित यांनी शनिवारी (दि. 18) दिली.
शेतमालाला योग्य भाव मिळावा आणि कष्टकर्यांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी किसान सभेचा हा लाँग मार्च नाशिकच्या दिंडोरी येथून मुंबईच्या दिशेने निघाला होता. पाच दिवसांची पायपीट केल्यानंतर कष्टकरी व शेतकर्यांचा जनसमूह शहापूरपर्यंत पोहचला होता. पुढच्या काही तासांमध्ये हा लाँग मार्च मुंबईत धडकला असता, परंतु त्यापूर्वीच तो शांत झाला आहे. सरकार आणि शेतकरी शिष्टमंडळाची बैठक यशस्वी ठरल्याने लाँग मार्च स्थगित करण्याचा निर्णय झाला. आता या सर्व शेतकर्यांना घरी परतण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे.
आम्ही एकूण 17 मागण्या केल्या होत्या. यापैकी काही मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. काही मागण्या एक महिन्याने अंमलात येणार आहेत, तर काही मागण्या या केंद्र सरकारशी संबंधित असल्याने त्या केंद्राकडे पाठविण्यात येणार आहेत. या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शेतकरी नेते गावित यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper