उरण ः प्रतिनिधी
स्वातंत्र्यानंतर तब्बल 62 वर्षे देशात काँग्रेसने सत्ता भोगली, मात्र त्यांना देशाचा जनतेला अपेक्षित विकास करता आला नाही. काँग्रेसच्या सत्ताकाळात आठवड्यास एक घोटाळा उघडकीस येत होता. या उलट परिस्थिती मोदी सरकारची आहे. हे सरकार लोकाभिमुख व पारदर्शक असून मागील नऊ वर्षांच्या सत्ताकाळात एकही घोटाळा झाला नाही, असे प्रतिपादन केंद्रीय जहाज बांधणी राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी रविवारी (दि. 25) उरण येथे केले.
भाजपच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या नऊ वर्षांच्या कारकिर्दीतील लेखाजोखा मांडण्यासाठी उरण येथे बुद्धिजीवी संवादाचा कार्यक्रम जेएपीएच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मंत्री नाईक बोलत होते. या कार्यक्रमास भाजपचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आशिष शेलार, भाजप मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख व रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, अॅड. किशोर ठाकूर, डॉ. सुरेश पाटील, महेश कडू, निळकंठ म्हात्रे, सुधीर घरत, जॅस्मिन गॅस आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सुमारे 400 डॉक्टर, वकील,उद्योजक यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
स्वातंत्र्योत्तर काळात अधोगतीकडे जाणार्या देशाला सामर्थ्यवान बनविण्याचे महान कार्य मोदी सरकारने केले आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी संवेदनशील असणार्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या नऊ वर्षांत देशाच्या प्रगतीचा आलेख सतत उंचावत ठेवल्याने जागतिक स्तरावर आज भारत सामर्थ्यवान देश म्हणून ओळखला जात आहे. याच पोटदुखीमुळे मोदी विरोधक आपले अस्तित्व टिकविण्यासाठी एकत्र येत आहेत. असे असले तरी आगामी निवडणुकीत देशातील जनता पुन्हा देशाची सत्ता पंतप्रधान मोदींच्याच हाती देईल, असा विश्वास आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला. आमदार महेश बालदी यांनीही सर्वसामान्यांसाठी कार्यरत असलेल्या मोदी सरकारचे कौतुक केले.
Check Also
पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …
RamPrahar – The Panvel Daily Paper