Breaking News

दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल; 96.75 टक्के निकाल

अलिबाग ः प्रतिनिधी
दहावीच्या परीक्षेत मुंबई विभागामध्ये रायगड जिल्हा अव्वल ठरला आहे. जिल्ह्यातील 96.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात पनवेल तालुका अव्वल असून सर्वाधिक 97.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीच्या परीक्षेसाठी रायगड जिल्ह्यातून 35 हजार 913 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 35 हजार 727 विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. यामधील 34 हजार 568 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक हजार 159 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत 1.47 टक्के जास्त निकाल लागला आहे. या वर्षी विद्यार्थ्यांच्या उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 96.75 टक्के इतके आहे. गेल्या वर्षी जिल्ह्यातील 95.28 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते.
जिल्ह्यात मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 97.65 टक्के, तर मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 95.87 टक्के इतके आहे. म्हणजेच मुलांच्या तुलनेत उत्तीर्ण होण्यात मुली 1.78 टक्क्यांनी आघाडीवर आहेत. 18 हजार 87 मुले परीक्षेला बसले होते. त्यापैकी 17 हजार 341 उत्तीर्ण झाले, तर 17 हजार 640 मुली परीक्षेला बसल्या होत्या. त्यातील 17 हजार 227 उत्तीर्ण झाल्या.
तालुकानिहाय निकाल (टक्क्यांमध्ये)
पनवेल 97.76, माणगाव 97.68, महाड 97.58, म्हसळा 97.56, पोलादपूर 96.94, अलिबाग 96.81, पेण 96.69, उरण 96.56, रोहा 96.54, श्रीवर्धन 96.29, मुरूड 95.99, कर्जत 94.97, खालापूर व तळा प्रत्येकी 94.54, सुधागड 92.59.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply