Breaking News

पश्चिम बंगालमध्ये शाह‘निती’ यशस्वी ; 18 जागांवर भाजपचा विजय

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था

पश्चिम बंगालमध्ये भाजपला पहिल्यांदाच मोठा विजय मिळाला आहे. गेल्या निवडणुकीत दोन जागा जिंकणार्‍या भाजपने तब्बल 18 जागांवर विजय मिळवत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. दरम्यान, सर्व जागांवर विजय मिळवण्याची अपेक्षा करणार्‍या तृणमूल काँग्रेसला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले आहे, तर काँग्रेसच्या हाती केवळ एकच जागा आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या चाणक्य नितीचा फायदा भाजपला झाल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षांपासूनच अमित शहा यांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या विजयाचे प्रयत्न सुरू केले होते, तसेच भाजप शहा यांच्या मिशन-23च्या जवळ पोहचली असल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. निवडणुकीपूर्वीच केंद्रात पुन्हा एकदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असतानाच शहा यांनी पश्चिम बंगालकडेही आपला मोर्चा वळवला होता. त्यातच उत्तर प्रदेशातील सभांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक सभा पश्चिम बंगालमध्ये घेतल्या होत्या, तर अमित शहा यांनीदेखील 11 सभा घेतल्या होत्या. हिंदुत्त्व आणि घुसखोरीसारखे महत्त्वाचे मुद्दे भाजपने उचलून धरले होते, तसेच ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर जनता नाराज असल्याचेही त्यांनी म्हटले होते.

अमित शहा यांनी लोकसभेच्या 543 जागांसाठी पक्षाकडून 600 कार्यकर्त्यांना पूर्णवेळ कामासाठी नियुक्त केले होते. त्यापैकी 543 जणांवर लोकसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. तसेच ज्या लोकसभेच्या जागांवर भाजपचा जोर नाही, अशा जागांसाठी पाच-पाच सुपरवायझरही नियुक्त करण्यात आले होते. साडेतीन लाख कार्यकर्त्यांनी एकत्रित दीनदयाल विस्तारक योजनेंतर्गत पक्षाच्या सक्षमीकरणासाठी बूथ लेवलवर काम केले होते, तसेच चार हजार कार्यकर्त्यांना सहा महिन्यांपासून एका वर्षापर्यंत पूर्ण वेळ वॉलेंटियर्स म्हणूनही काम सोपवण्यात आले होते.

ज्या ठिकाणी भाजपची पकड कमी होती, अशा 120पेक्षा अधिक जागांवर शहा यांनी विशेष लक्ष दिले होते. या जागांचा शहा यांनी विशेष आढावा घेतला होता, तसेच त्यांनी केंद्रीय युनिटशी जोडलेल्या 19 विभागांच्या कामांवरही विशेष लक्ष दिले होते. याच शहा’निती’चा फायदा भाजपला पश्चिम बंगालमध्ये झाला आहे.

बॅनर्जी यांनी प. बंगालमधील सर्व जागांवर विजयाची इच्छा व्यक्त केली होती, परंतु त्यांच्या इच्छेवर पाणी फेरले गेले. झारखंडला लागून असलेल्या बाकुंडा, पुरूलिया व झाडग्राम या भागांत भाजपने उत्तम प्रदर्शन केले, तर उत्तर बंगालमधील दार्जिलिंग, जलपाईगुडी व अलीपुरदुआरसारख्या जागांवरही भाजपला यश मिळाले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply