Breaking News

यंदाचा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये

लंडन : वृत्तसंस्था

50 ओव्हरचा क्रिकेट वर्ल्ड कप आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भारतीय टीम वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पोहोचली आहे. 30 मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होईल. 44 वर्षात दुसर्‍यांदाच हा वर्ल्ड कप राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे.

राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे या वर्ल्ड कपमध्ये सहभागी झालेल्या 10 टीम एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. यामुळे प्रत्येक टीम कमीत कमी 9 मॅच खेळेल. यानंतर टॉप-4 टीम या सेमीफायनलमध्ये प्रवेश करतील. याआधी 1992 साली ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळवण्यात आलेला वर्ल्ड कप या फॉरमॅटमध्ये होता.

वर्ल्ड कपमध्ये 1992 साली पहिल्यांदा वापरण्यात आलेला राऊंड रॉबिन फॉरमॅट पाकिस्तानसाठी लकी ठरला होता. इम्रान खानच्या नेतृत्वात पाकिस्तानने 1992 चा वर्ल्ड कप जिंकला होता, तर भारताला त्या वर्ल्ड कपमध्ये फक्त 2 मॅच जिंकता आल्या होत्या आणि 6 मॅचमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे भारताला इतिहास बदलावा लागणार आहे.

राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये प्रत्येक टीम एकमेकांविरुद्ध खेळते, यामुळे सगळ्यांना समान संधी मिळते. ग्रुप स्टेजमध्ये मात्र मजबूत टीम एकत्र आल्या, तर एखाद्या चांगल्या टीमचं नुकसान होतं. राऊंड रॉबिन फॉरमॅटमुळे स्पर्धेचा कालावधी वाढतो, त्यामुळे खेळाडूंना फिटनेस आणि फॉर्म कायम ठेवण्याचं आव्हान असतं.

11 पैकी 6 वर्ल्ड कप ग्रुप फॉरमॅटमध्ये

क्रिकेट वर्ल्ड कप आतापर्यंत तीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आले. 4 वर्ल्ड कप ग्रुप आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये खेळले गेले. 1999, 2003 आणि 2007 सालचा वर्ल्ड कप ग्रुप आणि सुपर-6/सुपर-8 आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये झाले. पुढचे दोन वर्ल्ड कप पुन्हा ग्रुप आणि नॉकआऊट फॉरमॅटमध्ये पार पडले. आता पुन्हा एकदा आयसीसी राऊंड रॉबिन फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप खेळवणार आहे.

1983 आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला. 1983 वर्ल्ड कपमध्ये भारताने 8 मॅच खेळल्या, यातल्या 6 मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर 2 मॅचमध्ये भारताला पराभव पत्करावा लागला.

2011 वर्ल्ड कपमध्ये भारताने 9 मॅच खेळल्या, यातल्या 7 मॅचमध्ये भारताचा विजय झाला तर एक मॅचमध्ये भारत पराभूत झाला. इंग्लंडविरुद्धची मॅच टाय झाली.

1992 सालच्या वर्ल्ड कपमध्ये विजयी झालेल्या पाकिस्तानने 10 मॅचपैकी 6 मॅच जिंकल्या होत्या. फायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता. सुरुवातीच्या राऊंडमध्ये इंग्लंडने पाकिस्तानला 74 रनवर ऑलआऊट केलं होतं.

2007 चा वर्ल्ड कप जिंकणार्‍या ऑस्ट्रेलियाने 11 मॅच खेळल्या होत्या. एका वर्ल्ड कपमध्ये एवढ्या मॅच खेळण्याचा हा विक्रम आहे. 2007 वर्ल्ड कपमध्ये ग्रुप स्टेजनंतर 8 टीम सुपर-8मध्ये गेल्या होत्या. यानंतर सेमीफायनल आणि फायनल खेळवण्यात आली.

पहिले दोन वर्ल्ड कप (1975, 1979) जिंकणार्‍या वेस्ट इंडिजने प्रत्येक स्पर्धेत फक्त 5-5 मॅच खेळल्या होत्या. यातल्या 1975 वर्ल्ड कपच्या पाचही मॅच वेस्ट इंडिजने जिंकल्या, तर 1979मध्ये त्यांनी 4 मॅच जिंकल्या आणि 1 मॅच रद्द झाली.

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply