कर्जत : बातमीदार : नेरळ-माथेरान रेल्वे मार्गाने जाताना अमान लॉज रेल्वे स्थानकापुढे सखाराम तुकाराम पॉईंट लागतो. त्या ठिकाणी 2005 च्या अतिवृष्टीत तेथील माती आणि झाडे वाहून गेली होती. त्यामुळे सखाराम तुकाराम पॉईंट परिसरात एकही मोठे झाड शिल्लक राहिले नसल्याने रस्त्याने जा ये करणार्याना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन माथेरानमधील काही तरुणांनी गतवर्षी त्या ठिकाणी झाडे लावली आणि दररोज पाणी घालून त्या झाडांचे संगोपन करण्याचे काम सुरु ठेवले आहे. सीताराम शिंदे आणि चंद्रकांत घाग यांनी आपल्या घरातील लहान मुलांसह घरून पाणी आणून पाणी घालण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.
सखाराम तुकाराम पॉईंटवरून माथेरान गावात आणि दस्तुरी नाका येथे जाताना पर्यटक आणि स्थानिकांची दमछाक होत असते. कारण त्या ठिकाणी एकही झाड नसल्याने तेथील 150 मीटरचे अंतर उन्हात पार करताना मोठी अवघड परिस्थिती सर्वांची होत असते. तो परिसर ओसाड वाटू लागल्याने गतवर्षी प्रसाद सावंत यांच्या वाढदिवशी (26 सप्टेंबर) तेथे वृक्षारोपण करण्यात आले. माथेरानमधील इंदिरा नगर परिसरात राहणारे कार्यकर्ते आणि वृक्षप्रेमी सीताराम शिंदे आणि चंद्रकांत घाग या दोघांनी झाडांचे संगोपन करण्याचा विश्वास दिला होता. माथेरान नगरपालिकेने त्या झाडांना लोखंडी जाळ्या लावून दिल्या. गेली अकरा महिने सीताराम आणि चंद्रकांत हे दोन तरुण त्या ठिकाणी लावलेल्या 20 झाडांचे संगोपन करीत आहेत. सीताराम शिंदे आणि चंद्रकांत घाग यांनी आपल्या घरातील बच्चेकंपनीसह हाती घेतलेले काम सर्वांना मदतीचे ठरणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper