
खोपोली : प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील डाळ उत्पादन करणार्या ईटीसी कंपनीत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून शासकीय अधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी वावोशी विभागाचे मंडळ अधिकारी संदीप जाधव, सरपंच शैलेश मोरे, तलाठी तसेच कंपनीचे व्यवस्थापक राकेश पांडे, सुनील लोखंडे, ग्रामसेवक बी. पी. पाटील आदी उपस्थित होते.
ईटीसी कंपनीने सामाजिक बांधिलकी लक्षात घेत जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून कंपनी कार्यक्षेत्रातील मोकळ्या जागेत वृक्ष लागवड केली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक राकेश पांडे, सुनील लोखंडे यांच्या संकल्पनेतून एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच शैलेशराव मोरे, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचारी तसेच शासकीय अधिकार्यांमध्ये वावोशी मंडळ कार्यालयाचे मंडळ अधिकारी संदीप जाधव, तलाठी बोराडे, सहकारी मनोज वालेकर व कंपनीचे सर्व कामगार उपस्थित होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी कंपनीच्या व्यवस्थापकांनी शेकडो विविध वनस्पतींची झाडे रोपवाटिकेच्या माध्यमातून उपलब्ध करून घेऊन ती झाडे आपल्या कंपनीतील मोकळ्या जागेत नियोजनबद्ध पद्धतीने लावली. कंपनी व्यवस्थापक राकेश पांडे व सुनील लोखंडे यांनी कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.
RamPrahar – The Panvel Daily Paper