अलिबाग : प्रतिनिधी
गेले अनेक दिवस रायगडकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो पाऊस गुरुवारी (दि. 27) अखेर बरसला. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेले रायगडकर सुखावले. त्याचप्रमाणे दुबार पेरणीचे संकट टळून बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
पाऊस पडत नसल्यामुळे उकाड्याने रायगड जिल्ह्यातील लोक हैराण झाले होते, तर मान्सूनपूर्व पावसामुळे उगवून वर आलेली भाताची रोपे पिवळी पडायला लागली होती. परिणामी शेतकरी चिंतातूर होता. बुधवारी रात्री उशिरा पावसाने जिल्ह्याच्या उत्तर भागात हजेरी लावली. त्यानंतर गुरुवारी दक्षिणेत जोर दिसून आला. महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, माणगाव, मुरूड भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा पसरला असून, आल्हाददायक वातावरण तयार झाले आहे.
या पावसामुळे भातरोपांना जीवदान मिळाले आहे. आता भाताची दुबार पेरणी करावी लागणार नाही. त्यामुळे शेतकर्यांची मोठी चिंता मिटली आहे.
– महाडमध्ये आदिवासीचा मृत्यूमहाड : तालुक्यात पावसाने जोरदार एण्ट्री केली असून, या पावसात दारू प्यायलेल्या एका आदिवासीचा पायरीवरून पडून मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार अनिल काटकर (22) आणि मयत व्यक्ती रामदास वसंत पवार (25, दोघेही रा. करंजखोल आदिवासीवाडी, ता. महाड) दारूची नशा करून सुकट गल्ली येथे पावसामुळे आडोशाला पायरीवर उभे होते. या वेळी दोघांत बाचाबाची झाली. अजित चव्हाणला जाब विचारत असताना रामदास पवार पायरीवरून पाय घसरून पडला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper