श्रीवर्धन : प्रतिनिधी
खोल समुद्रात दक्षिणेकडून जोरदार वारे वाहत असून मोठ्या लाटा उसळत आहेत. या बदलत्या हवामानामुळे खोल समुद्रात मच्छी मिळेनाशी झाली आहे. शिवाय सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यास मच्छीमार धजावत नाहीत. परिणामी आवक घटल्याने श्रीवर्धनच्या बाजारात मासळी महागली आहे.
शासनाच्या आदेशानुसार यंदा 1 सप्टेंबरपासून मासेमारी सुरू झाली खरी, पण त्या दिवसापासून आजतागायत सतत हवामानात बदल होत आहे. खोल समुद्रात दक्षिणेकडून वादळी वारे वाहत असल्यामुळे मच्छी दूर पळाली आहे. मोठ्या लाटा उसळत असून अधूनमधून वादळ सुरू असल्याने समुद्रात जाण्यास मच्छीमार धजावत नाहीत. श्रीवर्धनमधील मच्छीमारांनी आपल्या नौका दिघी, आदगाव, जीवना बंदर तसेच मुळगावच्या खाडीत नांगरल्या आहेत.छोट्या फल्लटीवाले मच्छीमार खाडीत वा समुद्रकिनारी मासेमारीसाठी जातात. त्यांना अल्प प्रमाणात मासळी मिळत असून, तिची चढ्या भावाने विक्री होते. मच्छी महागल्याने खवय्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper