अलिबाग : प्रतिनिधी
प्रवाशांच्या भारमानात एसटीचा रायगड विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर होता, मात्र दिवसेंदिवस एसटी प्रवास करणार्या प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. त्यामुळे रायगड विभाग भारमानात राज्यात शेवटच्या क्रमांकावर गेला आहे.
राज्य परिवहन मंडळाने भाडेवाढ केल्यामुळे रायगड जिल्ह्यात एसटी उत्पन्नात वाढ झाली आहे, मात्र प्रवाशांची संख्या कामी झाल्यामुळे भारमान मात्र 7 टक्क्यांनी घटले आहे. गेल्या वर्षी जिल्ह्याचे प्रवासी भारमान 64 होते. ते घटून यावर्षी 56वर आले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी एसटीने मोहीम सुरू केली आहे.
जिल्ह्यात सहा आसनी रिक्षांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर आता टाटा मॅजिक, इकोसारख्या गाड्यांमधून प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे एसटीच्या प्रवासी संख्येवर परिणाम झाला आहे. प्रवासी संख्येतील ही तूट भरून काढण्यासाठी रायगड विभागाने योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रवासी संख्या वाढवणार्या चालक आणि वाहकांना रोख स्वरूपातील बक्षिसे दिली जाणार आहेत, तर गुणवत्तापूर्ण सेवा देणार्या कर्मचार्यांचा गौरव होईल.