चंद्रपूर : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि लोकमान्य टिळकांचा हा प्रदेश आहे. येथेच स्वराज्यासाठी लढाई सुरू झाली होती आणि हे लोक आम्हाला महाराष्ट्र आणि कलम 370चा काय संबंध अशी विचारणा करतात. शरद पवारजी, तुम्हाला मोतीबिंदू झाला आहे. मतांच्या लालसेपोटी तुम्हाला राज्यातील लोकांना काय हवे आहे हेदेखील माहिती नाही, असा हल्लाबोल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर केला.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथे शुक्रवारी (दि. 18) आयोजित प्रचारसभेत अमित शहा यांनी पवारासंह विरोधकांवर घणाघाती टीका केली. आमच्यासाठी देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे. हिंमत असेल तर राहुल गांधी आणि शरद पवार यांनी आम्ही सत्तेत आल्यानंतर 370 कलम पुन्हा आणू, असे बोलून दाखवावे, असे आव्हान शहा यांनी दिले.
या वेळी शहा यांनी पुन्हा एकदा राज्यात आमचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला, तसेच भाजप कार्यकर्ते एक दिवस आधीच 24 ऑक्टोबरला राज्यात दिवाळी साजरी करतील, असेही ते म्हणाले.
शहा यांनी सरकारने आदिवासींसाठी केलेल्या कामांची माहिती दिली. मोदी सरकारच्या चांगल्या निर्णयांचा उल्लेख करीत तिहेरी तलाकवरही भाष्य केले. तिहेरी तलाक रद्द करून सरकारने देशातील कोट्यवधी महिलांना सुरक्षा देत सन्मान वाढवला आहे, असेही शहा यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper