नवी दिल्ली : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’द्वारे देशातील जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या वेळी पंतप्रधानांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि देशाच्या एकतेचा उल्लेख करीत अयोध्या प्रकरणावर भाष्य केले. दिवाळीचा प्रकाश सर्वदूर पसरवत शत्रुत्वाची भावना समाप्त करून टाका, असा बंधुभाव आणि प्रेमाचा संदेश दिला.
पंतप्रधान मोदी आपल्या मन की बातमध्ये म्हणाले की, आजकाल केवळ भारतातच नव्हे, तर जगातील अनेक देशांमध्ये दिवाळी साजरी केली जाते. विशेष म्हणजे जगातील देशात दिवाळी महोत्सवात केवळ भारतीयच सहभाग घेत नसून, तेथील सरकारे आणि स्थानिक नागरिकही मोठ्या प्रमाणात भाग घेत आहेत.
आपला भारत देश हा सणांचा देश आहे. आपल्या देशात फेस्टिव्हल टुरिझमचा विकास करण्यास मोठा वाव आहे, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी सर्व सणांचा प्रसार करायला हवा. इतकेच नाही, तर आपल्या या आनंदात इतर राज्ये आणि देशांनाही सहभागी करून घ्यावे, असे आवाहनही केले.
देशी वस्तू खरेदी करण्याचे आवाहन
देशातील जनतेने नेहमी देशी वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’द्वारे केले. एखादी वस्तू गावात मिळत असेल, तर ती खरेदी करण्यासाठी तालुक्याला जाण्याची गरज नाही आणि एखादी वस्तू तालुक्याला मिळत असेल, तर जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही. जनतेने स्थानिक वस्तू खरेदी कराव्यात. महात्मा गांधी यांच्या जंयतीनिमित्त आपली स्वप्ने अशा प्रकारे नक्कीच पूर्ण करू शकतो, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधानांची दिवाळी जवानांसोबत
देशभरात दिवाळीची धामधूम सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी जम्मू आणि काश्मीर राज्यात दाखल झाले. या वेळी त्यांनी जवानांना मिठाई भरवून त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
RamPrahar – The Panvel Daily Paper