नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
भारताचा पुरुष संघ फिफा विश्वचषकात कधी खेळेल हे सांगता येणे कठीण आहे, पण महिला फुटबॉल संघ जागतिक क्रमवारीत पुरुषांपेक्षा सरस आहे. पुरुषांमध्ये फिफा विश्वचषकात पात्र ठरण्यासाठी बरीच चढाओढ असली तरी भारताचा महिला संघ मात्र भविष्यात नक्कीच फिफा विश्वचषकात खेळेल, असे मत केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केले.
ऐतिहासिक गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने शनिवारी
(दि. 2) 2020च्या 17 वर्षांखालील महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले. गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूवर ‘लेझर शो’द्वारे साकारलेला बोधचिन्हाचा नयनरम्य सोहळा सर्वांची वाहवा मिळवून गेला.
1950च्या दशकात पात्र ठरूनही भारतीय संघाला फिफा विश्वचषकात खेळता आले नव्हते. 130 कोटी लोकसंख्या असलेला आपला देश मग आता फिफा विश्वचषकासाठी का पात्र ठरू शकत नाही? सर्व जगात फुटबॉल हा खेळ पहिल्या क्रमांकावर आहे. मग भारतातच का नाही? कोणत्याही मोसमात, कोणत्याही वातावरणात, कुणीही फुटबॉल हा खेळ खेळू शकतो. मग आपण यात मागे का पडत आहोत, याची कारणे सर्वांनी शोधायलाच हवीत. फुटबॉल हा खेळ देशाच्या कानाकोपर्यापर्यंत नेण्यासाठी आपले सरकार नेहमी कटिबद्ध असणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. पुढील वर्षी भारतात होणार्या 17 वर्षांखालील महिला फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत भारताचा महिला संघ पहिल्यांदाच उतरत आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वांच्याच सहकार्याची नितांत आवश्यकता आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. या वेळी ‘फिफा’च्या महिला फुटबॉलच्या प्रमुख सराय बेअरमन तसेच अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
महिलांची फुटबॉल लीग लवकरच
क्रीडा मंत्रालयातर्फे लवकरच देशात महिलांची फुटबॉल लीग आयोजित केली जाणार आहे. पुढील महिन्यात त्याविषयीची घोषणा केली जाणार आहे. महिला आणि बालविकास मंत्रालय तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि एआयएफएफ यांच्याशी बोलणी करून लवकरच या स्पर्धेचे संपूर्ण स्वरूप आणि बोधचिन्ह जाहीर करण्यात येईल. फुटबॉल हा खेळ एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा मानस आहे, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper