अकोला : प्रतिनिधी
ओल्या दुष्काळाच्या स्थितीत काळजीवाहू सरकार म्हणून काम करताना अडचण होते. लवकरात लवकर सरकार स्थापन करणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोल्यातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे. पावसामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौर्यावर आले आहेत.
अवकाळी पावसामुळे हातात आलेला हंगाम नष्ट झाला आहे. ओला दुष्काळ आहे, पण शेतकर्यांनी काळजी करू नये. शेतकर्यांना
सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी दिली.
फडणवीस म्हणाले, दुष्काळाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. शेतकर्यांना दुष्काळात देण्यात येणारी सर्व मदत आताही देण्यात येणार आहे. शेतकर्यांना आता कोणत्याही वसुलीला सामोरे जावे लागणार नाही. विमा कंपन्या शेतकर्यांचे पंचनामे ग्राह्य धरणार आहेत. पंचनामे होऊ शकले नाही म्हणून मदत मिळणार नाही असे होणार नाही. सर्व शेतकर्यांना मदत मिळणारच. याविषयी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी चर्चा सुरू आहे.
शेतकर्यांना चांगली मदत हवी असेल तर 6 तारखेपर्यंत 100 टक्के पंचनामे करण्याचे आवाहन फडणवीस यांनी या वेळी केले. लवकरात लवकर पंचनामे करण्यासाठी अधिक अधिकारी आणि कर्मचार्यांची गरज पडली, तर कृषी विद्यापीठातील कर्मचार्यांची आणि विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.