Breaking News

पत्रकार हा समाजजीवनाचा आरसा -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेलमधील ज्येष्ठ पत्रकार व वृत्तपत्र विक्रेत्यांचा सन्मान

पनवेल : रामप्रहर वृत्त
आपला देश एकसंध राहिला पाहिजे, ही भावना पत्रकारांनी समाजामध्ये रुजवली. समाजाच्या भावना लोकापर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकार सातत्याने करीत असतात. त्यामुळेच पत्रकार म्हणजे समाजजीवनाचा
आरसा आहे, असे उद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 6) नवीन पनवेल येथे काढले.
पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून ज्येष्ठ पत्रकारांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार बाळाराम पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रेय नवले, ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर पुढे म्हणाले की, जीवनपद्धती झपाट्याने बदलत असताना पनवेलचे रूपही झपाट्याने बदलले असून, या बदलाला पत्रकार चांगले रूप देत आहेत. ब्रेकिंग न्यूज किंवा ताजी बातमीच्या अनुषंगाने होणार्‍या धावपळीतून पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. माहिती व तंत्रज्ञानाने स्वरूप बदलले असले तरी त्याचा या क्षेत्रात चांगल्या प्रकारे उपयोग करण्यासाठी त्याचा वेध घेणेही तेवढेच गरजेचे झाले आहे. आजची पत्रकारिता पूर्वीपेक्षा कठीण नसली तरी आधुनिक युगाच्या तुलनेत आव्हानात्मक आहे. या वेळी त्यांनी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीला 10 वर्षे पूर्ण झाली असल्याने शुभेच्छा दिल्या. आज पनवेलच्या इतिहासात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय काम झाले आहे आणि आज माझ्यासमोर तिसरी पिढी पत्रकारिता क्षेत्रात उतरली आहे. आजही तोच उत्साह पत्रकारांमध्ये दिसत असून, पत्रकारिता हे एक वेगळे रसायन आहे व समाजसुधारणेचे हे रसायन नव्या पिढीनेही अंगीकारले आहे. आज पनवेलमध्ये पत्रकारांची संख्या वाढली आहे आणि त्यामध्येही जो तो आपले स्थान कायम ठेवून असल्याने त्यांचे कौतुकच करावे लागेल. आज इतक्या दिवंगत पत्रकारांसह ज्येेष्ठ पत्रकारांनी दिलेल्या योगदानामुळे पत्रकारिता जिवंत राहिली आहे. अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे काम पत्रकार करीत असून, पत्रकारांनी धावपळ करीत असताना आपले आरोग्य सांभाळण्याची गरज व्यक्त करून त्यांनी सर्व पत्रकारांना पत्रकार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.  
आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले आहेत ते स्व. ज्येष्ठ पत्रकार सर्वांसाठी आदर्श आहेत. त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांना कायम मिळत राहणार आहे. वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम पनवेलमधील पत्रकारांनी स्वतःला झोकून देत केले आहे. या प्रवासामध्ये आपण केलेल्या कामामुळे आज पनवेल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रगत बनत चालले आहे. माहिती-तंत्रज्ञानाची नवीन साधने आली असून, त्या अनुषंगाने पत्रकारिता क्षेत्रातील नवनवीन बदल आणि आव्हाने पेलण्यासाठी आपण सक्षम असल्याचे आजपर्यंतच्या प्रवासातून दिसून येत असल्याचे त्यांनी सांगत यापुढेही सर्व क्षेत्रात भरीव कामगिरी होत राहो, अशा शुभेच्छा दिल्या.  
आमदार बाळाराम पाटील, ज्येष्ठ पत्रकार विनायक पात्रुडकर, उपविभागीय दत्तात्रय नवले यांनीही आपल्या मनोगतातून पत्रकारांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी दैनिक वादळवाराचे संपादक विजय कडू यांना स्व. ल. पा. वालेकर स्मृती जीवनगौरव पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांना स्व. शशिकांत गडकरी स्मृती जीवनगौरव पुरस्कार, दैनिक किल्ले रायगडचे संपादक प्रमोद वालेकर यांना स्व. भरत कुरघोडे स्मृती जीवनगौरव पुरस्कार आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील पोतदार यांना स्व. मधुकर दोंदे स्मृती जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, कार्याध्यक्ष संजय कदम, उपाध्यक्ष रत्नाकर पाटील, सरचिटणीस मंदार दोंदे, खजिनदार केवल महाडिक, प्रसिद्धिप्रमुख राज भंडारी, साहिल रेळेकर, अनिल भोळे, शेखर भोपी, विवेक पाटील, अनिल कुरघोडे, गणपत वारगडा, विशाल सावंत, संतोष भगत, मयूर तांबडे, रवींद्र गायकवाड, राजेश डांगळे, प्रवीण मोहोकर, वचन गायकवाड, दीपक घोसाळकर, अरविंद पोतदार, शशिकांत कुंभार, संतोष सुतार, भरतकुमार कांबळे, सुभाष वाघपंजे, सुनील कटेकर, राकेश पितळे, हरेश साठे, लक्ष्मण ठाकूर, समितीचे कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. मनोहर सचदेव आदींचा तसेच ऊन, पाऊस आणि वार्‍याची तमा न बाळगता वृत्तपत्र वाचकांपर्यंत पोहचविण्याचे काम करणारे वसंत पप्पू काळंगे, महेश ठक्कर, अविनाश पडवळ, मंगेश फडके या वृत्तपत्र विक्रेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, मनोहर म्हात्रे, तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, सुरेखा मोहोकर, साई संस्थान वहाळचे अध्यक्ष रविशेठ पाटील, गणेश कडू, रामदास शेवाळे, सुदाम पाटील आदी उपस्थित होते.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply