औरंगाबाद : प्रतिनिधी
19व्या राष्ट्रीय मायक्रोबायो-ऑलिम्पियाड स्पर्धेत टीवायबीएससी स्तरावर जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्ट्स, कॉमर्स व सायन्स महाविद्यालयाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्यासंघाने प्रथम क्रमांक पटकाविला. या संघात जुवेरिया राऊत, अक्सा देशमुख व हेतल पटेल यांचा सहभाग होता. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयाने द्वितीय, व मुंबईच्या मिठीबाई महाविद्यालयाने
तृतीय क्रमांक पटकाविला.
शासकीय विज्ञान संस्थेच्या सुक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे 19व्या राष्ट्रीय मायक्रोबायो-ऑलिम्पियाड स्पर्धेच्या अंतिम फेरीचे आयोजन शनिवारी (दि. 15) करण्यात आले होते. जैव-विज्ञान विषयातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक जागरूकता वाढविणे, सूक्ष्मजीवांचे स्वरूप व कार्य समजावून नवोदित सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाना जैवशास्त्राच्या नवनवीन संशोधनाबाबत अवगत करून देणे, तसेच वैज्ञानिक तत्त्वे लागू करण्याची विद्यार्थ्यांच्या क्षमतेचा विकास घडवून आणणे इत्यादी प्रमुख उदिष्टे ठरवून ह्या वर्षी 19व्या मायक्रोबायोलीम्पियाडचे आयोजन डॉ. उल्हास पाटील व डॉ. अजय जाधव यांच्या नेतृत्वात प्रथमच राष्ट्रीय स्तरावर झाले. या स्पर्धेत 108 महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला असून 110 विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यात सीकेटीच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या विनिता मोरे यांनी यश मिळवले.
19व्या राष्ट्रीय मायक्रोबायोलीम्पियाड कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण एनसीसीएस, पुणे येथील प्रसिध्द शास्त्रज्ञ डॉ. योगेश शौचे; मायक्रोबायोलोजी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डॉ. ए. एम. देशमुख व शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. एस. जी. गुप्ता यांचा हस्ते झाले. विद्यार्थ्यांचा हा विकास घडवण्यासाठी विभागातील सहकारी प्राध्यापक नीलिमा तिदार, गणेश साठे, अर्चना गंधारकर, अनवेश वेमुला, डॉ. अनुभा खरे, नमिता गरुडे व मीनल भालेराव हे नेहमीच प्रयत्नशील असतात. नीलिमा तिदार यांनी महाविद्यालय स्तरावर स्पर्धेच्या समन्वयक म्हणून कार्यभार सांभाळला.
या यशाचे श्रेय विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षकांना व पालकांना दिले. संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, अध्यक्ष अरुणशेठ भगत, आमदार प्रशांत ठाकूर, सभागृह नेते परेश ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे व उपप्राचार्य डॉ. संजय पाटील तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी विजेत्या संघाचे व त्यांच्या शिक्षकांचे अभिनंदन केले.
अशा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणे आवश्यक असते त्यात प्रमुख्याने विषयाची सखोल माहिती, विश्लेषणात्मक क्षमता, तर्क क्षमता व सादरीकरण यांचा समावेश आहे.– निलेश वडनेरे, विभाग प्रमुख, सूक्ष्म जीवशास्त्र
RamPrahar – The Panvel Daily Paper