पेण : प्रतिनिधी
पेणमधील शहापाडा धरणाच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे 27 वाड्यांवर बुधवार (दि. 18)पासून दोन टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू करण्यात येणार आहे. मसद ग्रामपंचायत हद्दीतील 10 आणि शिर्की ग्रामपंचायत क्षेत्रातील 17 वाड्यांची तहान टँकरद्वारे भागविली जाणार असल्याची माहिती पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत पाटील
यांनी दिली.
पेण तालुक्यातील 27 गावे व 43 वाड्यांना पाणीपुरवठा करणार्या शहापाडा धरणाची जलपातळी तळाला गेली आहे. त्यामुळे या धरणातून ग्रामीण भागात आठवड्यातून दोन वेळाच पाणीपुरवठा केला जात आहे. पेण पंचायत समिती प्रशासनाकडे सध्या दोन टँकर उपलब्ध झाले आहेत. या टँकरव्दारे मसदमधील 10 आणि शिर्कीतील 17 अशा एकूण 27 वाड्यांवर बुधवारपासून पाणीपुरवठा सुरू करण्याचे नियोजन आहे.टंचाईग्रस्त भागात असलेल्या वाड्यांचे प्रस्ताव सादर झाले आहेत. याप्रमाणे प्रस्ताव आलेल्या प्रत्येक ठिकाणी टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येईल. शहापाडा धरणाच्या पाण्याने तळ गाठला असल्याने येणारे पाणी गाळून घ्यावे व ते उकळून थंड करून पिण्यासाठी वापरले जावे. पुढचे 15 दिवस महत्त्वाचे आहेत. सर्व नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे निर्देश प्रत्येक गावात संबंधित ग्रामपंचायत कार्यालयातील सरपंच व ग्रामसेवक यांना देण्यात आले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper