
पनवेल : बातमीदार
जनता कर्फ्यू संपल्यानंतर पनवेलमध्ये सोमवारी (दि. 23) नागरिकांनी सकाळपासूनच जीवनावश्यक व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात लोक घोळक्याने फिरत होते. त्यामुळे पनवेल परिसरात जमाव बंदीच्या आदेशाला हरताळ फासला जात आहे. कलम 144 लागू झाल्यापासून शासनाने जमावबंदीचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे पाचपेक्षा जास्त नागरिकांना एकत्र जमता येणार नाही, असे असले तरी या नियमाला धाब्यावर बसवले जात आहे. पनवेल शहरासह ग्रामीण भागात देखील नागरिक मोठ्या संख्येने घराच्या बाहेर पडत आहेत. अत्यावश्यक कामे असतील तरच घराच्या बाहेर पडा, असे आवाहन केले जात असताना देखील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येताना दिसले. काही ठिकाणी पोलिसांनी बाहेर फिरणार्या नागरिकांना काठीचा प्रसाद दिला. शहरातील भाजी मार्केट येथे शेकडोंच्या संख्येने नागरिक एकत्र आले होते. तर खासगी रिक्षाचालक रस्त्यावर वाहने फिरवताना दिसत होते. अनेक ठिकाणी पोलीस नागरिकांना घरी जाण्याचे आवाहन करीत होते. कर्फ्यू संपल्यानंतर नागरिकांनी मोठ्या संख्येने वस्तूची खरेदी करण्यास गर्दी करण्यास सुरुवात केली. कोरोनाच्या विषाणूमुळे पनवेलमध्ये 50 टक्केपेक्षा कमी वाहने रस्त्यावर फिरत आहेत. असे असले तरी काही नागरिक खासगी गाड्यांमध्ये देखील नागरिक गावी जात होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper