
पनवेल : बातमीदार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदी लक्षात घेता सर्वसामान्य गरीब कुटुंबांना, रोजगार करून पोट भरणार्या मजुरांचे अन्नावाचून हाल होऊ नयेत म्हणून शनिवारी (दि. 28) पनवेल शहर अंतर्गत असलेल्या पोलीस चौकीच्या पोलीस अधिकार्यांनी धान्यवाटप तर करंजाडे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक मंडळाकडून अन्नवाटप केले. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री मध्यरात्रीपासून संपूर्ण देशामध्ये 21 दिवस लॉकडाउन घोषित केले आहे. यामधून जीवनाश्यक वस्तू व दुकाने वगळण्यात आले आहे. त्याचबरोबर संचारबंदीमध्ये नागरिकांनी कामानिमित्त घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. जीवनाश्यक वस्तू व वैद्यकीय कारणासाठी नागरिक बाहेर पडताना दिसत आहे. या वेळी करंजाडे व ग्रामीण भागातील बाजारपेठ पूर्णपणे कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे. यामुळे येथील बाजारपेठ, हॉटेल, दुकाने बंद असल्याने बेघर लोकांना जेवण आणि पाणी मिळणेही कठीण झाले होते. या पार्श्वभूमीवर पनवेल शहर पोलीस ठाणेअंतर्गत असलेली करंजाडे पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षक दीपक कादबाने यांच्या पुढाकाराने येथील बेघर लोकांना धान्यांचे वाटप केले. त्याचबरोबर परिसरातील सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारी करंजाडे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक मंडळाच्या वतीने परिसरामध्ये गरिबांना अन्न व पाण्याचे वाटप करण्यात आले. या वेळी पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper